‘फिलाटेली’प्रेमी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची संधी
ए.डी. सरंगले ः दोन टप्प्यात परीक्षा, अर्जाची अंतिम मुदत ९ सप्टेंबर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः भारतीय टपाल विभागातर्फे आयोजित फिलाटेली (पोस्टाची तिकिटे जमवण्याचा) छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ पर्यंत आहे. चालू आर्थिक वर्षात होणाऱ्या दीनदयाळ शिष्यवृत्ती योजना परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना पोस्टाच्या तिकीटसंग्रहामध्ये रूची निर्माण व्हावी यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श योजना २०१७-१८ पासून सुरू करण्यात आलेली आहे. फिलाटेली हा छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी ४० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही योजना ६वी ते ९वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्तीची रक्कम ६ हजार वार्षिक असून, महिन्याला ५०० रुपये मिळणार आहेत. मान्यताप्राप्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. वार्षिक परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी किंवा ग्रेड पॉइंट बंधनकारक आहे. त्यासाठी शाळेचा फिलाटेली क्लब असावा आणि संबंधित विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. जर शाळेचा क्लब नसेल तर त्या संबंधित विद्यार्थ्याचे स्वतंत्र फिलाटेली खाते असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. प्रथम लेखी परीक्षा विभागीय स्तरावर घेतली जाईल. पहिल्या स्तरामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम निवडीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये फिलाटेली प्रकल्प सादर करावा लागेल. अंतिम निवड केवळ फिलाटेली प्रकल्पात मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेमध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न १ गुणाचा असेल आणि त्यात कोणतेही नकारात्मक गुणांकन नसेल. लेखी परीक्षा संपूर्ण विभागासाठी एकाचवेळी रत्नागिरीमध्ये घेतली जाईल. या प्रकल्पाचा विषय सर्कल ऑफिसद्वारा देण्यात येणार असून, टपालखात्याचे प्रतिनिधी आणि प्रसिद्ध फिलाटेलिस्ट यांचा समावेश असलेली एक समिती सर्कल पातळीवर स्थापन केली जाईल आणि त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन केले जाईल. या योजनेसाठीची लेखी परीक्षा २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक शाळा प्रतिनिधींनी सहभागाकरिता जवळील पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा व आपले अर्ज नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
गतवर्षी ३१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३१ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यामधील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेच्या एका विद्यार्थ्याचे महाराष्ट्र सर्कल स्तरावरती निवड झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.