91714
शासन निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करा
योगेश कदम ः सावंतवाडी मतदारसंघाच्या आढावा बैठकीत सूचना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याच्या कामाची म्हणावी तशी प्रगती झाली नसल्याचे समोर आले. तसेच, आठ महिन्यांपासून सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी प्रत्येक विभागाने जलद गतीने करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सर्व घरकुल, अंगणवाडी आणि सरकारी इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
देवराई आणि सीआरझेड क्षेत्रातील बांधकाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील देवराई जमिनी वनसदृश असल्या तरी त्या वन कायद्याच्या अखत्यारीत येत नाहीत, त्यामुळे शासनाचा निधी तिथे वापरता येऊ शकतो. या जमिनींची नोंद करून तिथे बांधकामे किंवा इतर वैशिष्ट्यपूर्ण कामांना मंजुरी दिली जावी. सागरी किनारी सीआरझेड कायद्याचे पालन करून वाढीव बांधकामांना ग्रामपंचायतींनी नियमांनुसार परवानगी द्यावी आणि जिथे ग्रामपंचायतींना अधिकार नाहीत, तिथे महसूल विभागाने परवानगी द्यावी, असे निर्देश दिले.
सावंतवाडी तालुक्यातील ६५ हजार सातबारांपैकी केवळ दीड हजार सातबारा जिवंत झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि उर्वरित ६४ हजार सातबारा जिवंत करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. चौकुळ गावाचे भूमी अभिलेख मोजणीचे काम ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. याकडे तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी लक्ष वेधले होते. ग्रामपंचायतींना अजूनही इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याबद्दल प्रेमानंद देसाई यांनी लक्ष वेधले. मंत्री कदम यांनी उप जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांना पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. सरपंचांना मानधन मिळाले नसल्याबद्दल आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर यांनी लक्ष वेधले. मंत्र्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, असे सांगितले. सचिन वालावलकर यांनी लक्ष वेधले असता त्यांनी खरेदीखत नोंदणीनंतर सातबारा ऑनलाइन पद्धतीनेच झाले पाहिजे आणि ऑफलाईन अर्ज मागू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनरेगा अंतर्गत कोकणात कामे होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि ही कामे वाढवण्याचे निर्देश दिले. सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल अशा पद्धतीने काम करावे. ग्राम स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयातील न्यायालयीन प्रकरणे वेळेत निकाली काढावीत. सर्व विभागांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर वाढवावा. गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे आणि गरजू नसलेल्या लाभार्थ्यांना वगळावे. या बैठकीत आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. मंत्री कदम यांनी येत्या सहा महिन्यांत पुन्हा आढावा घेण्यासाठी येईन आणि तोपर्यंत आज दिलेल्या कामांचा अहवाल तयार ठेवण्याचे निर्देश दिले.
--------------
मोफत वाळूसाठी अर्ज करा
घरकुल योजना आणि वाळू पुरवठा मंजूर झालेल्या घरकुलांसाठी मोफत वाळू पुरवठ्याची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज करून वाळू मिळवावी आणि तहसीलदारांनी त्यांना ती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.