24943
शॉर्टसर्किटने झालेल्या हानीची
भरपाई न मिळाल्याने उपोषण
न्हावेलीतील प्रकार, दोन वर्षे प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट होऊन आंबा व काजू बागेला आग लागून संपूर्ण बाग जळून खाक झाली. सलग दोन वर्षे हा प्रकार होऊनही अद्याप शासनाकडून एकही रुपयाची नुकसानभरपाई न मिळाल्याने न्हावेली चौकेकरवाडी येथील केशव चौकेकर व आपा चौकेकर यांनी येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्री. चौकेकर यांच्या म्हणण्यानुसार, २९ फेब्रुवारी २०२४ तसेच ६ मे २०२५ ला शॉर्टसर्किट होऊन त्यांच्या ५ एकर आंबा व काजू बागेचे मोठे नुकसान झाले. कलमांसह बाग शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाली; मात्र दोन वर्षे होऊनही अद्याप त्यांना एकही रुपया नुकसानभरपाई मिळालेली नाही. जवळपास ९० लाखांचे नुकसान या दोन वर्षांत झाले असून केवळ १ लाख ८७ हजार रुपयांची मदत महावितरणकडून देण्याचे आश्वासन दिले जात आहे. या तुटपुंज्या नुकसानभरपाईत पुन्हा बागायत उभी करणे देखील मुश्किल आहे. उपजीविकेचे एकमेव साधन शेती असल्याने एकतर भरपाई द्यावी, अन्यथा महावितरणमध्ये नोकर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जीर्ण झालेल्या विद्युत यंत्रणेमुळे वारंवार शॉर्टसर्किट होऊन नुकसान होत असल्याने ही यंत्रणा इतर मार्गाने वळवावी, अशी मागणी श्री. चौकैकर यांनी करत बेमुदत उपोषण छेडले आहे.