नाचणेत कचऱ्यातून खतनिर्मिती
गावचा आदर्श प्रकल्प ; लातूर पथकाची भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : शहरानजीकच्या नाचणे ग्रामपंचायतीकडून राबवण्यात आलेला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प सध्या राज्यासाठी आदर्श ठरत आहे. या प्रकल्पाला राज्यातील विविध भागांतील समूह भेट देऊन माहिती घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील ४६ जणांच्या पथकाने शनिवारी (ता. २५) प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
राज्यामधील ग्रामीण भागातील नाचणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प व गोबरधन प्रकल्प राबवण्यात येत आहे. प्रकल्पातून खतनिर्मिती करण्यात येत असून, त्याची विक्री करून ग्रामपंचायतीला आर्थिक हातभार लागला आहे. हा प्रकल्प सध्या राज्यासाठी आदर्श ठरत असून, राज्यातील विविध भागांतून समूह भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील ४६ जणांच्या पथकाने प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. तसेच प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास न होता या प्रकल्पातून खतविक्री होऊन ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे हा प्रकल्प ग्रामपंचायतीसाठी वरदान ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या वेळी नाचणे ग्रामपंचायतीचे प्रशासक ऋषिकेश भोंगले, ग्रामविकास अधिकारी जी. के. खरंबळे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.