निर्दोष ठरूनही तक्रारींचा ससेमिरा
पाटबंधारेतील महिला अधिकाऱ्यांविरोधात अर्जांचा धडाका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : रत्नागिरी पाटबंधारे विभाग सध्या प्रशासकीय कामकाजापेक्षा एका वेगळ्याच कुरघोडीने जोरदार चर्चेत आहे. कोकणातील एका प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरोधात सातत्याने सुरू असलेल्या तक्रारींच्या सत्रामुळे विभागातील वातावरण गढूळ बनले आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय चौकशीत निष्कलंक सिद्ध होऊनही तक्रारींचे हे चक्र थांबेना. यावरून ही केवळ तक्रार आहे की, प्रशासकीय डावपेच, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या चर्चेत असलेल्या संबंधित महिला अधिकारी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि अनुभवाच्या बळावर त्यांना बढती मिळून त्या कोकण विभागाच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्या; मात्र, त्यांच्या या प्रगतीनंतरच रत्नागिरीबाहेरील काही अनोळखी व्यक्तींकडून वरिष्ठ पातळीवर तक्रारींचे अर्ज पाठवण्याचा धडाका सुरू झाला. प्रशासकीय पातळीवर या अर्जांची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी पार पडली. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार चौकशीत संबंधित अधिकाऱ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा किंवा आक्षेपार्ह बाब निष्पन्न झाली नाही. तरीही वारंवार नव्या तक्रारी दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने, यामागे काही विशिष्ट हितसंबंध गुंतल्याचा संशय व्यक्त होत आहे.