rat14p5.jpg-
57223
राजापूर ः रानभाजी महोत्सवात बोलताना नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे. या वेळी उपस्थित सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव आणि पदाधिकारी.
रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवा
हुस्नबानू खलिफे ; राजापुरातील रानभाज्या महोत्सवाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः “कोकणातील रानभाज्यांची समृद्ध परंपरा, त्यांचे पौष्टिक मूल्य आणि आरोग्यदायी महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असून अशा महोत्सवांच्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्व सार्यांना पटवून देता येईल. ” असे प्रतिपादन नगराध्यक्षा तथा माजी विधान परिषद आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी केले.
तालुका कृषी विभाग, आत्मा आणि पंचायत समिती राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने किसान भवन येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. या वेळी उपसभापती गुरव म्हणाले, “सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे आणि जंकफूडच्या वाढत्या संस्कृतीमुळे पारंपरिक आहाराची ही परंपरा हरवत चालली आहे. पूर्वीच्या पिढीला रानभाज्या आणि पारंपरिक आहाराचे महत्त्व चांगलेच ज्ञात होते. त्यामुळे पूर्वीची पिढी अधिक निरोगी व दीर्घायुषी होती. तरुणाईला रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध ठिकाणी अशा महोत्सवांचे आयोजन करण्याची गरज आहे."
या कार्यक्रमावेळी पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, रमेश सूद, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंदार सप्रे, राजंगा कंपनीचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांसह पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शेतकरी उपस्थित होते.