India vs Australia 3rd Test Cricket Score : अति घाई संकटात नेई... असा इशारा रस्त्यावर प्रवास करताना पाहायला मिळत असतो, पण अगदी त्याच वाक्याची आठवण इंदूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी झाली. ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत आतापर्यंत वर्चस्व राखणाऱ्या भारताचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांत गारद झाला. यात फलंदाजांची घाई मुळावर आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५६ अशी मजल मारून तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी पकड मिळवली.
इंदूरची खेळपट्टी फिरकीला साथ देणार असा अंदाज वर्तवायला ज्योतिषाची गरज नव्हती. सामना सुरू होताना खेळपट्टी इतकी कोरडी दिसत होती, की चेंडू पहिल्यापासून वळणार हे उघड होते. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून चांगले काम केले, कारण चौथ्या डावात कोरड्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे जिकिरीचे होणार आहे. मिचेल स्टार्कने टाकलेले पहिले षटक नाट्यमय होते.
रोहित शर्मा दोन वेळा बाद होताना वाचला, कारण पाहुण्या संघाने मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागितली नाही. एकदा रोहित शर्मा झेलबाद होता; तर दुसऱ्या वेळी पायचीत होता. शुभमन गिल- रोहितने काही चांगले फटके मारून धावफलकाला गती दिली. ५ षटकांनंतर २७ धावा फलकावर लागलेल्या दिसल्याने स्टीव्ह स्मिथने लगेच डावखुरा फिरकी गोलंदाज कुहनेमनला गोलंदाजीला आणले. अंदाज न घेता पुढे सरसावत फटका मारण्याची घाई रोहितला तंबूत परत पाठवणारी ठरली. पाठोपाठ कुनेमनने चांगली फलंदाजी करणाऱ्या शुबमन गिलला झेलबाद केले.
चेतेश्वर पुजारा त्रिफाळाचीत झाला तो नॅथन लायनचा चेंडू खूपच वळला. जडेजा आणि श्रेयस अय्यरला फटका मारायची घाई नडली. अय्यर बाद झाला तेव्हा चेंडू यष्टींना चाटून गेला आणि काही क्षणांनंतर बेल्सचे दिवे क्षणभर लागले. ५ बाद ४५ धावसंख्येवरून विराट कोहली आणि भरतने जरा डाव सावरला. विराट संयमी आणि भक्कम बचावाची खेळी उभारत होता. टॉड मर्फीने राऊंड द विकेट टाकलेला चेंडू हवेत बाहेर जाऊन टप्पा पडल्यावर किंचित वळला आणि कोहलीच्या पॅडवर आदळला. पायचित होऊन विराट निराश चेहऱ्याने तंबूत परतला.
दर्जेदार फिरकी माऱ्यासमोर बाकी फलंदाजांचा निभाव लागला नाही. उमेश यादवने दोन चौकार, एक षटकार मारून भारताला शंभरी पार करून दिली इतकेच. तरीही कुनेमनच्या ५ बळींनी भारताचा डाव उपाहारानंतर काही वेळात गुंडाळला गेलाच.
अपेक्षेप्रमाणे भारतीय गोलंदाजीची सुरुवात जडेजा-अश्विन जोडीने केली. जडेजाने ट्रॅव्हीस हेडला पायचित करून चांगली सुरुवात केली. तसेच त्याने लबुशेनला शून्यावर त्रिफाळाचीत केले होते, फक्त तो चेंडू नोबॉल असल्याने त्याला जीवदान लाभले. जडेजा गेल्या तीन कसोटी सामन्यांत नोबॉल टाकत होता. त्याचा खरा फटका भारतीय संघाला लबुशेनच्या विकेटच्या रूपाने सहन करावा लागला.
नजर स्थिरावल्यावर ख्वाजा आणि लबुशेन जोडीने मान खाली घालून फलंदाजी केली. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न त्यांनी टाळला आणि पळून धावा काढण्यावर भर दिला. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चकले तिथेच ख्वाजाने अर्धशतक करून दर्जा दाखवला. लबुशेनने खंबीर फलंदाजी करून ख्वाजाला चांगली साथ दिली. दोघांनी ९६ धावांची उभारलेली भागीदारी भारतीय संघाचे दडपण वाढवू लागली. जडेजाने लबुशेनला बोल्ड करून भागीदारी तोडली. सुंदर फलंदाजी करणाऱ्या ख्वाजाला स्वीपचा फटका मारायचा मोह महागात पडला आणि ६० धावा करून तो तंबूत परतल्यावर भारतीय संघाला परत आशा वाटू लागल्या. सुदैवाने सर्वांत चिकट फलंदाज स्टीव्ह स्मिथ २६ धावा करून जडेजाला बाद झाला.
नोबॉल आणि चुकलेले अंदाज
इंदूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज बाद केले तरीही त्याचे जास्त कौतुक होणार नाही. एक तर गेल्या दोन कसोटींत जडेजाकडून सतत नोबॉल पडत होते तरी त्यात सुधारणा झाली नाही आणि त्रिफाळाचित झालेला लबुशेन परत खेळू लागला. दुसरी गोष्ट होती जडेजाच्या चुकलेल्या अंदाजांची, जडेजाचे अंदाज चुकल्याने ४५ षटकांमध्येच तीन डीआरएस वाया गेले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.