तात्या लांडगे
सोलापूर : अभ्यासात हुशार असलेले हजारो विद्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९५ ते ९८ टक्के गुण मिळवितात. पण, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने इच्छा असूनही त्यांना जेईई किंवा नीट परीक्षेची तयारी करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांची दहावीनंतर दरवर्षी स्वतंत्र परीक्षा होईल. प्रत्येक जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा दोन वर्षांचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांनाही त्याची संधी मिळणार आहे.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने ‘सुपर-५०’ ही नवी योजना प्रस्तावित केली आहे. त्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. मागच्यावेळी दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता अकरावीत आहेत. ते विद्यार्थी बारावीत गेल्यावर जेईई व नीट परीक्षेची तयारी करतात.
त्यामुळे यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा झाल्यावर दहावी आणि आता अकरावीतील जे विद्यार्थी बारावीमध्ये जातील, त्यांची एक चाचणी घेतली जाणार आहे. त्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून ५० तर अकरावी उत्तीर्ण (विज्ञान शाखेतील) विद्यार्थ्यांमधून ५० असे यंदा १०० विद्यार्थी गुणवत्ता यादीवरून निवडले जातील, असेही त्या प्रस्तावात म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील होतकरू, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेनंतर निवडीची परीक्षा
राज्य शासनाने ‘सुपर- ५०’चा प्रस्ताव मान्य केल्यावर ही योजना सुरू होईल. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका शासनाकडूनच तयार करून दिली जाईल. गुणवत्तेनुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून ५० विद्यार्थी निवडले जातील. त्यांच्या आवडीनुसार जेईई किंवा नीट अथवा काहींना दोन्ही परीक्षेच्या (जेईई व नीट) प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. शासनाच्या वतीने त्या विद्यार्थ्यांची नामांकित कोचिंग क्लास तथा प्रशिक्षण संस्थांमधून ‘जेईई’ व ‘नीट’ची तयारी करून घेतली जाणार आहे.
शासनाला प्रस्ताव सादर, मंजुरीनंतर कार्यवाही
राज्य शासनाला त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून दरवर्षी ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यासाठी दहावीत उत्तीर्ण होऊन विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल. त्यातून मेरिटवरून ही निवड होईल. गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेतून जेईई, नीट परीक्षेची तयारी करता येईल. त्यांचा दोन वर्षांचा खर्च शासनाकडून होईल, असा तो प्रस्ताव आहे.
- महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.