सोलापूर - अभ्यासक्रम बदलूनही आधुनिक यंत्रसामग्री नाही, शिक्षकांची रिक्तपदे, संस्थाचालकांना केंद्र व राज्याकडून अनुदान न मिळाल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, पदविका, आयटीआयकडे वाढलेला कल या प्रमुख कारणांमुळे विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर घटलेल्या पटसंख्येची मागील तीन वर्षांची माहिती सरकारने मागविली आहे. त्यानुसार राज्यातील तब्बल ३६८ महाविद्यालये बंद होतील, अशी माहिती राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांनी दिली.
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने १९८८ मध्ये कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यभरात ११४ विनाअनुदानित, ५३ शासकीय, तर ९१७ अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू झाली. त्यासाठी केंद्र सरकारकडून संस्थाचालकांना अनुदानही मिळत होते. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती होती, परंतु मागील चार-पाच वर्षांपासून अनेक महाविद्यालयात ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश होत आहेत. ‘कॅम्पस्’ निवड नाही, बॅंकांकडून व्यवसायाकरिता कर्जही मिळत नाही. पदविकेसाठी प्रवेश मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांचा कल आयटीआय अथवा पदविका अभ्यासक्रमाकडे वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोलापूर, उस्मानाबाद, बीड, नागपूरसह अन्य जिल्ह्यांमधील व्यवसाय अभ्यासक्रमांची अनुदानित महाविद्यालये बंद होतील, असेही सांगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.