मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार बहुमत चाचणीत पास झाले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राज्यपाल कोश्यारी यांनी नव्या सरकारचे संकल्प आपल्या भाषणातून मांडले.
राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर आपल्या भाषणातून भाष्य केले. ते म्हणाले, सीमा भागातील मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. सरकारला हवामान बदलांमुळे होत असलेल्या परिणामांची पूर्ण कल्पना आहे. त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शिक्षण महागडे झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील मुलींना उच्चशिक्षण मोफत देण्यासाठी शासन उपाययोजना करेल, असेही त्यांनी सांगितले.
महिलांसाठी वसतिगृहे बांधणार
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी वसतिगृहे बांधली जातील. अंगणवाडी सेविकांना सेवा सक्षम करण्यासाठी त्यांना अधिक सुविधा दिल्या जातील. तसेच महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही राज्यपाल म्हणाले.
शिक्षण सुधारण्यास सरकारचे प्राधान्य
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुधारण्यास सरकारचे प्राधान्य राहील, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
स्थानिकांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य
राज्यात रोजगार निर्मितीसाठी रिक्त असलेल्या सरकारी नोकऱ्यांतील जागा भरण्याच्या हालचाली सुरु केल्या जाणार आहेत. याशिवाय स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाईल, असेही राज्यपाल म्हणाले.
शेतकऱ्यांना मिळणार मदत
पीकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. याशिवाय शेतमालाला भाव मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.