मुंबई : नव्या सरकारच्या स्थापनेनंतर विरोधी पक्षांत फोडाफोडीची शक्यता असतानाच या सरकारच्या भवितव्य ठरविणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाला काँग्रेसचे दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदार हजर राहू शकले नाहीत. काही आमदार खासगी कारणांमुळे येऊ शकले नाहीत, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार वेळेत सभागृहात न आल्याने त्यांना दारातच रोखले गेले.
काँग्रेसचे दहा आमदार एकावेळी न आल्याने चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या आईचे निधन झाल्याने ते या अधिवेशनात आले नाहीत. ‘राष्ट्रवादी’चे आमदार अण्णा बनसोडे हे बहुमत चाचणीला नसल्याने त्यांच्या नाराजीचा मुद्दा पुढे आला. आमदार संग्राम जगताप हेही वेळेत आले नव्हते. काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी हेही उशिराने आल्याने त्यांना मतदान करता आले नाही. आमदार प्रणिती शिंदे या परदेशात आहेत. आमदार जितेश अंतापूरकर यांचे रविवारी (ता.३) लग्न झाल्याने ते अधिवेशनाच्या कामकाजात नव्हते.
उशिराचा फटका
अधिवेशनाचे कामकाज आज सकाळी अकरा वाजता सुरू झाले. उशिरा येणाऱ्यांना मतदानापासून लांब राहावे लागणार होते, ते आधी जाहीर करण्यात आले होते. तरीही काही आमदार सव्वाअकरापर्यंत आले. त्यांना सभागृहात प्रवेश दिला नाही. परिणामी, महाविकास आघाडीच्या बाजूच्या मतांचा आकडा शंभरीच्या पुढे जाऊ शकला नाही.
पोलिसांच्या दुचाकीवरून विधानभवन गाठले
सभागृहात वेळेत येण्यापासून मतदान करण्याच्या पद्धतीबाबत भाजपच्या आमदारांना तंबी मिळाली होती. त्यामुळे या पक्षासह त्यांच्यासोबत असलेल्या शिंदे गटाचे आमदार वेळेत विधानभवनात आले. परंतु, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे पाऊस आणि त्यानंतरच्या वाहतूक कोंडी अडकले. त्यामुळे त्यांनाही वेळेत जाणे शक्य नव्हते. शेवटी आपली मोटार रस्त्यावरच सोडून चव्हाण हे बंदोबस्तातील पोलिसांच्या दुचाकीवरून विधानभवनात आले. ते १० वाजून ५० मिनिटांनी सभागृहात पोहोचले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.