पुणे - अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ७५० कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश सोमवारी (ता. ३) दिले. सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना हा निधी देण्यात येणार असून, तो आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तत्काळ जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे.
गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात समुद्रात ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळ झाले. त्यामुळे राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. त्यात पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांमधील शेतपिके आणि फळपिकांचे नुकसान झाले. त्यावर राज्य सरकारने दोन हेक्टरपर्यंतच्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना जिराईत पिकांसाठी प्रतिहेक्टर आठ हजार रुपये, तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ७५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सोमवारी मान्यता दिली. पुण्यासह कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयांमार्फत जिल्हा आणि तालुकास्तरावरून बाधित शेतकऱ्यांना हा निधी देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या व्यक्ती आणि कुटुंबांना निधीचे वाटप करण्यात येईल.
या रकमेतून बॅंकेने शेतकऱ्यांकडून कोणतीही वसुली करू नये. काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांचे नाव आणि खाते क्रमांक जुळत नसल्यास बॅंका तो निधी निलंबन खात्यात ठेवतात. अशा रकमांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे अशा रकमांचा दर आठवड्याला आढावा घ्यावा. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची यादी आणि रक्कम याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.