सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांसह राज्यातील एक लाख नऊ हजार शाळांमध्ये विज्ञानाचे जवळपास १३ हजार शिक्षक कमी आहेत. बारावीनंतर डीएड करून शिक्षक झालेल्यांची संख्या खूप असल्याने सध्या विज्ञान विषयाच्या तुलनेत समाजशास्त्र व भाषा विषयांचे शिक्षकच अधिक झाले आहेत. त्यामुळे त्याच शिक्षकांवर विज्ञान, गणित, समाजशास्त्र व भाषा विषयाची जबाबदारी सोपविल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यानंतर मुलांना माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणात अडचणी येत नाहीत. त्यासाठी विज्ञान व गणित हे दोन विषय पक्के होणे आवश्यक आहे. पण, पटसंख्येअभावी पाच हजारांहून अधिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असतानाही गुणवत्तावाढीसाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने सहावी ते आठवीपर्यंच्या मुलांसाठी सुरवातीला भाषा, समाजशास्त्र, गणित-विज्ञान असा विषयांचा प्राधान्यक्रम ठरविला. पण, त्यामुळे झेडपीच्या शाळांमध्ये भाषा व समाजशास्त्राचेच शिक्षक सर्वाधिक झाले. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम बदलला आणि विज्ञान, भाषा, समाजशास्त्र असा क्रम निश्चित केला. त्यावेळी २०१४-१५ मध्ये विज्ञाग-गणित शिक्षकांची संख्या कमी असल्याची वस्तुस्थिती समोर आली. तरीपण, विज्ञान विषयातून पदवी तथा पदवीधर (बीएससी, एमएससी) झालेले शिक्षक नसल्याने आता विज्ञान शाखेतून १२ वी होऊन शिक्षक झालेल्यांवर विज्ञान-गणित विषयांची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या शाळांवर विज्ञान व गणित विषयांचे शिक्षक कमी आहेत, त्याची माहिती संकलित केली जात आहे.
सोयीच्या बदल्यांसाठी शिक्षकांची शक्कल
शाळांवर समाजशास्त्र हा विषय शिकविणारे शिक्षक आता सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून त्या विषयाला नकार कळवून विज्ञान विषय शिकवायला तयार असल्याचे शिक्षण विभागाला कळवित आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विषयांची कमतरता भासत असल्याने शिक्षक बदल्यांपूर्वी विज्ञान विषयातून बारावी करून डीएड झालेल्या शिक्षकांना विषय बदण्याची संधी दिली जात आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार...
विज्ञान शाखेतून बारावी, डीएड केलेल्यांना मिळणार विषय शिक्षक म्हणून पदोन्नती
४५ पटसंख्या असलेल्या वर्गासाठी विज्ञान व भाषा या विषयांचे दोन शिक्षक आवश्यक
४६ ते ७९ विद्यार्थ्यांसाठी भाषा, विज्ञान व समाजशास्त्र, असे तीन शिक्षक गरजेचे
८० विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पटसंख्येसाठी विज्ञान, भाषा, समाजशास्त्र, विज्ञान असे चार शिक्षक असतील
शिक्षकांच्या बदल्यापूर्वी विषय शिक्षकांचा सुटणार तिढा, बारावी विज्ञाना झालेल्यांवर गणित, विज्ञानची जबाबदारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.