पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढू लागल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कोकण वगळता राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तीशी ओलांडली आहे. गेल्या आठवड्यात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वाढलेला उन्हाचा ताप असह्य होत आहे. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातील कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, शनिवारी (ता. 23) मराठवाड्यात, तर रविवारपासून (ता. 24) विदर्भात पावसाचा अंदाज आहे. जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा येथेही तापमान 37 अंश सेल्सिअसवर गेले आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होत असल्याने थंडी कमी झाली आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढग जमा झाले होते. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात पुढील चोवीस तासांमध्ये तर रविवारी (ता. 24) आणि सोमवारी (ता. 25) विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पुण्यात ढगाळ वातावरण शहर आणि परिसरात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरणास सुरवात झाली. शुक्रवारीही आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा 3.9 अंश सेल्सिअसने वाढून 36.2 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात पुणे आणि औरंगाबाद येथे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 6.6 अंश सेल्सिअसने वाढला होता. पुण्यात किमान तापमान 19.2, तर औरंगाबाद येथे 21 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. |