तात्या लांडगे
सोलापूर : सीना नदीचा महापूर ओसरला असून सध्या नदीत ४५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे उजनीतून सोडलेल्या पाण्याचा २५ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत आहे. पण, वडकबाळजवळील हत्तूर परिसरात सोलापूर-विजयपूर महामार्गावर अजूनही पाणी आहे. त्यामुळे उद्याही (बुधवार) हा महामार्ग वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे.
सीना नदीत दीड लाखांचा तर भीमा नदीत सव्वालाखाचा विसर्ग सुरू होता. तो आता कमी झाला तरी त्याचा परिणाम जाणवायला १० ते १४ तास लागतात. त्यामुळे उद्या (बुधवारी) सायंकाळी सहानंतर वडकबाळजवळील पाणी ओसरले, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीना-भीमा नदीच्या संगमावर भीमा नदीत मोठा विसर्ग असल्याने सीनेचे पाणी पुढे जात नाही. त्यामुळे हत्तूरजवळील महामार्गावर मंगळवारी (ता. ३०) पाणी होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्या महामार्गावरील वाहतूक सुरू केली नाही. सध्या या महामार्गावरील वाहतूक कामती-तेरामैलमार्गे पुढे सोडली जात आहे. हत्तूरजवळ महामार्गावर पाणी असल्याने वडकबाळ पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे.
उजनीतून २० वर्षांनंतर सोडले २०० टीएमसी पाणी
उजनी धरणातून २००५ मध्ये भीमा नदीद्वारे ३५३ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले होते. त्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात २०० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अजूनही उजनीतून भीमा नदीत विसर्ग सुरूच आहे. पहिल्यांदा २० जून रोजी उजनी ९० टक्के भरल्यावर भीमा नदीत पाणी सोडायला सुरू झाले होते. धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पातून सुमारे १० कोटींहून अधिक रुपयांची वीज तयार झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.