मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हटले. मात्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची युती अभेद्य आहे. पण यापुढे सर्व समान हवं अस म्हणत मुख्यमंत्री पदावर आपला दावा कायम असल्याचे संकेत दिले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद, उध्दव यांच प्रेम आणि शिवसैनिकांनी कडून ऊर्जा घेण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शिवसेना-भाजप ही भारतात सर्वात जास्त काळ चाललेली युती आहे. वाघ सिंहाची जोडी एकत्र येते तेव्हा जंगलाचा राजा कोण हे आधी ठरलेलं असत त्यामुळे युतीत मतभेद नाही.
देशात आणि महाराष्ट्रात युतीला मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे. शिवसेनेचे शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते हे या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.आपण सर्व भगव्यासाठी एकत्र आलो आणि आपलं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. शिवसेना पक्ष हा मोठा झाला पाहिजे अशा शुभेच्छा ही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला दिल्या.
आमच्यातील ताण तणाव संपावा ही शिवसैनिकांची इच्छा होती. देश हितासाठी आम्ही एकत्र आलो. लोकसभे प्रमाणे विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यती असा विजय आपल्याला मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.मित्र पक्षांना आपल्या कार्यक्रमाला बोलवण्याची नवीन परंपरा उध्दव यांनी घातली.यापुढे शिवसेनेच्या इतिहासात फडणवीस हे नाव असेल, मला येथे येण्याची संधी दिली यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
भाजप-शिवसेनेत सध्या जे चालू आहे ते नाटक नसून सर्व खर आहे. यापुढे महाराष्ट्राला एका युतीच्या पुढची गोष्ट सांगू या.माझा एक वैयक्तिक मित्र व मुख्यमंत्री या नात्याने मी फडनविसांना आमंत्रण दिले व त्यांनी मोकळेपणाने स्वीकारले.मात्र यावरून अनेकांच्या पोटशूळ उठल्याचे उध्दव म्हणाले.सावरकर यांच्यावर अपशब्द काढणाऱ्यांचा पराभव झाला असे म्हणत उध्दव यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.आपण ज्या वेळेला संघर्ष करत होतो त्या वेळेला विरोधी पक्ष भांडत नव्हता आणि आता तर विरोधी पक्षच नाही आहे.आता युती झाली आहे,मैदान साफ झालेल आहे.मात्र कसही धावून चालणार नाही कारण तंगड्यात तंगड घालून पडण्याची भीती आहे.आपण घेतलेला हिंदुत्वाचा वसा हा प्राण गेले तरी आम्ही सोडणार नाही. यापुढे युतीची घौडदौड एक साथ राहील असे उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केले.
पवार कंपनीला तिथेच राहुद्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय जादू आहे माहीत नाही पण ते आल्यापासून विरोधकच उरले नाहीत.पूर्वी आम्ही ही विरोधात होतो,नंतर तुमच्याकडे आलो.त्यांनी राधाकृष्ण विखेपाटलांना विरोधीपक्ष नेता केलं पण ते ही इकडे आले.पण माझी विनंती आहे पवार कंपनीला तिकडेच राहुद्या असे उद्धव यांनी सांगत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.