अहमदपूर (जि. लातूर) - तालुका व परिसरात मुसळधार पावसामुळे भाजीपाला व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नदीकाठच्या शेती मध्ये पुराने मोठे नुकसान झाले आहे.मागील चार दिवसपासून रात्रंदिवस होत असलेल्या पावसाने नदी, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत.
तालुक्यात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने गेल्या आठवड्याभरापासून दिवसभर रात्रभर झोडपत असल्याने तालुक्यातील साठवण तलाव, लघु तलाव 27 तलाव तुडूंब भरले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहेत. तालुक्यात सतत होणाऱ्या प्रजन्यमानामुळे पावसाची सरासरी ओलांडली असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान 700 मिलीमीटर इतके असून 28 सप्टेंबर अखेर तालुक्यात 970 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरल्याने सोयाबीन काढता येत नाही तर कांही शिवारात कापसाची फुले व बोंडे गळून जाऊन कापूस जमीनीवर पडला आहे. या संततधार पावसाने तालुक्यातील अनेक तलाव भरुन सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे.तालुक्यातील मोघा नदीला पुर आल्याने अहमदपूर - मोघा तर मन्याड नदीला पुर आल्याने किनगाव- लातूर रास्ता बंद झाला आहे.
तालुक्यातील सहा मंडळात आतापर्यंत झालेला मिलीमीटर मधे झालेला पाऊस.
अहमदपूर - 837
किनगाव - 921
अंधोरी - 779
खंडाळी - 1272
शिरूर ताजबंद - 1064
हाडोळती - 841
खंडाळी महसुल मंडळात सर्वाधिक पाऊस झाल्याने या मंडळातील खंडाळीसह, धसवाडी, नागझरी, रूध्दा, सुमठाणा, शेनकूड, उजना, गंगाहिप्परगा, वडारवाडी, जोडवाडी, सांगवी-सुनेगाव हगदळ -गुगदळ वरवंटी, शिंदगी, मांगदरी, रूई, राळगा आदी गावातील शेतकर्यांच्या शेतात पाणी साचले असून सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून पिकवीमा व नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.