छत्रपती संभाजीनगर : नेहमीच हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या काँग्रेसला भारतीय जनता पक्षाने संपवले होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी ‘बाळासाहेबांचे हिंदुत्व’ सोडून त्यांना साथ दिली. परिणामी काँग्रेस पुनरुज्जीवित झाली.
परंतु, यामुळे सर्वसामान्य हिंदूंचा, हिंदुत्वाचा खूप मोठा तोटा झाला. विशेषत: यात छत्रपती संभाजीनगरसारखी शहरेदेखील आहेत, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केला. ‘सकाळ’च्या थेट-भेट या उपक्रमात ते बोलत होते.
युतीत शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढल्यानंतर जनतेने भरभरून मतदान केले. जवळपास १८० जागा आमच्या पदरात पडल्या. असे असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मोहात आमची ‘साथ’ सोडून काँग्रेसचा ‘हात’ पकडला. परंतु, हे सरकार फार काळ टिकले नाही. पुन्हा एकदा हिंदुत्वाचे सरकार आले.
निश्चितच लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी आम्हाला फटका बसला. परंतु, मतांचा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांना पडलेल्या मतांमध्ये अर्धा टक्क्यांपेक्षा कमी मतांचा फरक होता. यामुळे विधानसभेत असे चित्र दिसणार नाही. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यातून जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ तीन मतदारसंघांमध्येच भाजप निवडणूक लढवत आहे. यामुळे किमान एखादी जागा तरी आम्हाला वाढवून मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. यात शहरातील असो की, ग्रामीणमधील कुठला तरी मतदारसंघ आम्हाला मिळावा, यासाठी प्रयत्न आहेत.
पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. इथे पक्षाची ताकद देखील चांगली आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम्ही जेव्हा लढलो होतो, त्यावेळेस अचानक लढल्यानंतर देखील आमचा उमेदवार केवळ साडेतीन हजार मतांनी पराभूत झाला होता. यामुळे कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ आम्हाला मिळावा, अशी अपेक्षा आहे. परंतु, यावर वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.
भाजपमध्ये निश्चितच महिलांचे संघटन मजबूत आहे, संख्याही अधिक आहे. याबरोबरच वाददेखील अधिक आहेत. यातूनच मागे ‘फ्री स्टाइल’ झाली होती. याबाबत त्यांना विचारल्यावर, नवीन लोकांकडे संयम थोडा कमी आहे. संयम ठेवतो तो राजकारणात पुढे जातो, असे सांगत त्यांनी या वादावर अधिक बोलणे टाळले.
लोकसभा निवडणुकीत आम्ही संविधान बदलणार, मराठा आरक्षण याबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यात आले. प्रत्यक्षात असे काहीच नव्हते. त्यामुळे आम्ही स्वतः मराठा समाजासह विविध समाजांत जात असे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत, निश्चितच यात आम्हाला यश मिळेल.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल, भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा सर्व भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. माझीदेखील तशीच भावना आहे. परंतु, महायुतीत यावर जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल, असे देखील बोराळकर यांनी नमूद केले.
पक्षाची ताकद वाढली असल्याने, विधानसभे पाठोपाठ होणारी महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढावी, अशी आमची मागणी आहे. यात सर्वच वॉर्डांत ‘कमळ’ चिन्हावर उमेदवार उभे राहावेत, अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.