पाचोड : तोट्याचे समजले जाणारे केळीचे पीक घेऊन अथक मेहनतीच्या बळावर मुरमा (ता.पैठण) येथील शेतकऱ्याने यंदा अवघ्या तीस गुंठ्यात ७८ हजाराचे भरघोस उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. एवढेच नव्हे तर खरिपाने दगा दिल्यानंतर ही केळीची बाग त्यांच्यासाठी वरदान ठरली असून या केळीने ''इराण''ला भुरळ घातली आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे सर्वत्र शेती व्यवसाय आतबट्टयाचा धंदा ठरला. प्रत्येक जण पाणी, मनुष्यबळ व आर्थिक टंचाईमुळे शेतीकडे पाठ फिरवत आहे. तर दुसरीकडे पिकविलेल्या मालाला अपेक्षित भाव नसल्याने केळी व पपईच्या बागांवर रोटाव्हेटर फिरवित असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र, मुरमा (ता.पैठण) येथील एकनाथ शिवनाथ लेंभे या शेतकऱ्याची मुरमा शिवारात नऊ एकर शेती असून तीन एकर मोसंबी, चार एकर कापूस, एक एकर कार्टुल्याची लागवड केली. एकरावर नवीन पीक घ्यायचे म्हणून शेती राखून ठेवली.
यंदा अतिवृष्टीने कहर केल्याने शेतीवर झाले ला खर्चही पदरी पडला नाही. मात्र, एकनाथ लेंभे यांना शेती सोडून रिकामे राहणे अस्वस्थ करू लागल्याने ता. १५ फेब्रुवारी २० रोजी त्यांनी तीस गुंठे क्षेत्रावर ''जी-नाईन'' वाणाची पाच बाय सात अंतरावर एक हजार ३० केळीच्या झाडाची लागवड करून सर्व क्षेत्राला ठिबक सिंचन केले. यानंतर त्यांनी पाचोड येथील प्रसाद अॅग्रो ट्रेडर्सचे भाऊसाहेब नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेणखत, अन्नद्रव्ये, दाणेदार सुपर फॉस्फेट व प्लेटो अॅग्रोचे सेंद्रिय खत ठिबक द्वारे दिले. कीड, रोगांचा फारसा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही वेळा बुरशीजन्य औषधीही फवारली. फळधारणे पर्यंत पाणी, खत व फवारणी व्यवस्थापनाची पत्नी आशाबाई व मुलगा रोहीत यांच्यासह काळजी घेतली.
दहा महिन्यानंतर (डिसेंबरमध्ये) काही झाडाचे केळीचे घड परिपक्व झाले, अन् सर्वत्र दोन ते तीन रुपये प्रति किलो दर असल्याने उत्पन्नाच्या हमीची आशा धूसर बनली. मात्र, हार न स्वीकारता श्री.लेंभे यांनी व्यापाऱ्याचा शोध सुरू ठेवला. अशातच खानापूर, जि.नगर येथील श्रीकृष्ण बनानाज् एक्सपोर्ट प्रा.लि. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या बागेस भेट देऊन सात रुपये प्रति किलोप्रमाणे केळीच्या घडाची खरेदी केली. खरेदी केलेली केळी ''त्या'' कंपनीने इराण येथे पाठविल्याचे एकनाथ लेंभे यांनी सांगितले.
प्रति घडाचे वजन ३६ ते ३८ किलोपर्यंत भरत असून पहिल्या तोडणीत नऊ टन एकशे तीस किलो व अन्य खर्च असे ७८ हजार रुपये हाती आले. आणखी दहा ते अकरा टन उत्पन्न येत्या पंधरवड्यात पदरी पडेल. अर्थात तीस गुंठ्यात दीड लाख रुपये हाती आले आहे. यंदा नऊ एकराला तीस गुंठे केळीचे क्षेत्र लाभदायक ठरल्याचे श्री.लेंभे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.