औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.
करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा बाजार कधी नाही तो मोठा भरला होता. सकाळी साधारण अकराच्या दरम्यान आम्ही बाजारात पोहोचलो. कोणी बैलं, तर कोणी म्हैस, गावरान गायी विकायला आणल्या होत्या. कोणाला अपेक्षित भावात विकत घ्यायचं होतं, तर कोणाला अपेक्षित भावात विकायचं होतं; पण यापैकी कोणाचीच अपेक्षा पूर्ण होत नव्हती.
‘जित्राब लै वंगाळय, पाठीला पोट गेलंय, यवढं पैसं लै होत्यात’ असं म्हणून जनावरांचा सौदा मोडत होता, तर झालेल्या भावात ‘जिवापाड संबाळलंय वं, खात्याघरचं होतं; पण आता खायाला घालायला उरलंच नाय, थोडं तरी वाढवून द्या की,’ अशी आर्त साद घालत जनावरं विकणारे बोलत होते. बाजारात मेसाई जवळगा (ता. तुळजापूर) येथील ८० वर्षांचे भगवान म्हस्के यांनी काम होत नाही म्हणून खिल्लारी बैल जोडी विकायला आणली खरी; पण भाव पाडून मागितल्याने ते खिन्न झाले होते.
वैरणीमुळे ती विकायला लागतेय
करजखेडा जनावरांच्या बाजारात मक्याच्या पाच पेंढ्या ऐंशी रुपयांना विकल्या जात होत्या. अनेक शेतकरी कमी भाव करा असा चारा विक्रेत्याला विनवणी करीत होते. आवं चाराच नाही, कसं भाव कमी करता येईल, असं तो सांगत होता. लोहारा तालुक्यातील कान्हेगाव येथून तो आला होता. तीन जनावरं विकायला आणली. उगच थोडं वैरण टाकयची. सगळीच जनावरं हवी; पण वैरणीमुळे ती विकायला लागतंय. तिही कमी भावात, असं शेतकरी महादेव बडे सांगत होते. ते उस्मानाबाद तालुक्यातील तोरांबा येथून करजखेड्याला जनावरं विकायला आले होते. काम नाय कुठं जावं. जे दूध मिळतंय ते विकतो, असं महादेवने आपल्या उपजीविकेबाबत सांगितले. पाच एकर शेती आहे. त्यात उसाच पीक घेतल होतं; पण तेही वाळून गेलं. आता एक गाय विकायला आणली असं फणीपूर (ता. लोहारा) येथील शेतकरी जमादार जहिरुद्दीन यांनी सांगितले.
जनावरांच्या किमतींत घसरण
उस्मानाबादी शेळ्यांची जोड २५ हजार रुपये असा होती. जर्सी गाय पन्नास, तर गावरान गाय ३० हजार रुपयांना विकली जात होती. दूध देणारी म्हैस ५०-६० हजार, तर पाटी म्हैस (दूध न देणारी) ३०-४० हजार अशी किंमत होती. सदरील भाव समाधानकारक नसल्याचे शेतकरी आम्हाला सांगत होते.
डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलाला व्यसन लागलेले, एकेक दिवस दुःखात जात होता, त्यात खायची चणचण, जगण्याचा प्रश्न ‘आ’वासून समोर उभा, त्यात हातउसने घेतलेले पैसे देणं होईना. सगळ्या विवंचनेतून मुलाने एक दिवस दोरी जवळ केली. तो संपला. मालक (पती) मिरचीवर औषध फवारतानी नाकातोंडात गेल्यामुळे वारलं, लेकींची लग्नं झाली तरी मला जगणं तर भागच आहे ना?
- विमल दणके, सिंदीफळ (ता. तुळजापूर)
शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्याशिवाय पर्याय नसतो. ते घेतात, मग व्याज वाढले, की आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जाते.
- जगदीश पाटील, करजखेडा
पाणी नाय. सायकलीवरून लांबून पाणी घेऊन याव लागतंय. ती लोकं घेऊनही देईना. सध्या जनावरांना किंमतच नाय. बैल तर शेतकामांसाठी लागतंय; पण विकावं काय!
- जमादार जहिरुद्दीन, शेतकरी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.