औरंगाबाद - मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या असताना त्या सोडविण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सरकारने ट्रिपल तलाकच्या नावाने शरियतमध्ये हस्तक्षेप केला आहे. ट्रिपल तलाकचा कायदा मागे घ्यावा, शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा, यासाठी शुक्रवारी (ता.23) आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मुस्लिम महिला मोर्चा कृती समिती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातर्फे भव्य महामोर्चा काढण्यात आला.
मोर्चानंतर विभागीय आयुक्त कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले, की प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे. मुस्लिम समाजात तलाकचे प्रमाण अतिशय कमी असताना फक्त राजकीय फायद्यासाठी काही महिलांना पुढे करून ट्रिपल तलाकचा कायदा करण्यात आला.
मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या आहेत. विधवा, निराधार महिलांकडे कुणीही लक्ष देत नाही. तलाक न देताच कित्येक महिलांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, त्यांचा प्रश्नसुद्धा गंभीर आहे. सच्चर समितीने मुस्लिम महिलांसाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. त्या सरकार का लागू करत नाही? समाजातील मूळ समस्यांकडे लक्ष न देता फक्त राजकीय फायद्याच्या अनावश्यक मुद्यांकडे लक्ष दिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
ट्रिपल तलाकचा कायदा मागे घ्यावा, यामागणीचे छोटे छोटे बॅनर अनेक महिलांनी आपल्या डोक्याला चिकटवले होते. विशेष म्हणजे उन्हाचा पारा चढलेला असतानाच दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आमखास मैदान येथून या मोर्चाला सुरवात झाली. रस्त्यात अनेक ठिकाणी मोर्चेकऱ्यांच्या पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मैदानावर सभा घेऊन मोर्चाचा समारोप झाला.
यात माहिती मोर्चाच्या समन्वयक फहीमुन्निसा बेगम, शाकेरा खानम, शाहिस्ता कादरी, शबाना आईमी, कमर सुलताना, समीना बानो, मुब्ब्शिरा फिरदौस, कादरी माहरुख, फातेमा फिरदोस, मेहराज पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला मोठ्या संख्येनी सहभागी होत्या. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.