परभणी - गत चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून, अनेक तालुके, मंडळांना पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गत २४ तासांत ५० मिलीमीटरची नोंद झाली असून, जिल्ह्यातील ५२ पैकी १५ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागातील नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत.
जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्वदूर पाऊस कोसळत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नव्हे तर अतिवृष्टी सोनपेठ तालुक्यात असून, या तालुक्यात ७२.९ मिलिमीटर तर त्या पाठोपाठ गंगाखेड तालुक्यात ६९.३ मिलिमीटर पावसाची पावसाची नोंद झाली आहे. परभणी तालुक्यात ५८.६, पाथरी तालुक्यात ३९.४, जिंतूर तालुक्यात २५.८, पूर्णा तालुक्यात ६१.९, पालम तालुक्यात ६०.४, सेलू तालुक्यात २३.४ तर मानवत तालुक्यात ५१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहरे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६१.३ मिलिमीटर असून, ता. एक जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.१ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील ५२ पैकी १५ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील सिंगणापून येथे ६८ मि.मी, दैठणा मंडळात ७८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गंगाखेड तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये गंगाखेड मंडळात ७०.८ मिमी, महातपुरी मंडळात ७१.८ मिमी, माखणी मंडळात ७२.५ मिलिमीटर, पिंपळदरी मंडळात ७५.४ मिमी. पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यातील ताडकळस व लिमला मंडळात प्रत्येकी ७०.८ मिमी पाऊस झाला. सोनेपठ तालुक्यातील आवलगाव मंडळ व वडगाव मंडळात प्रत्येकी ८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, मानवत तालुक्यातील केकरजवळा मंळात ६७.३ मिमी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच-पाच दिवसांपासून पावसाळी वातावरण असून, दिवसभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर, रात्री संततधार सुरु असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळासह अनेक मंडळातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले असून, अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. खरीपाच्या पिकांसाठी पाऊस पूरक असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. परंतु अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांना देखील धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.
शहरातील रस्त्यांनाही तलावाचे स्वरूप
परभणी शहरातही गत २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे शहराच्या गावठाणातील गांधी पार्क, गुजरी बाजार, क्रांती चौक, कच्छी बाजार, सुभाष रोड, आर.आर. टावर या भागातील, बाजारपेठेतील मुख्य रस्ते संपूर्ण पाण्याखाली गेले होते. त्यामुळे बाजारपेठेतून जाणाऱ्या नागरिकांची, व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. शनिवारी दिवसभर देखील पावसाची रिपरिप सुरु होती. अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे शहराच्या नव्या वसाहतींमध्ये जाण्याचे मार्ग देखील बंद झाल्याचे चित्र असून, नागरीकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.