Abu Azmi Targets MNS for Violence Against Migrants :आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणारे आणि वादातही अडकणारे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिंगावर घेतल्याचं दिसत आहे. मुंबईत परप्रांतीयांकडून मराठी माणसावर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. शिवाय, मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना मनसे स्टाईलने धडाही शिकवला जात आहे. या घटनांचे व्हिडिओ समोर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अबू आझमी यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलरवर एका व्हिडिओच्या माध्यमातून मनसेच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आणि एकप्रकारे ललकारलं देखील आहे. शिवाय, मुख्यमंत्री फडणवीसांकडेही त्यांनी कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.
अबू आझमींनी म्हटले आहे की, ‘’प्रत्येक राज्यात त्या राज्याची एक भाषा आहे. गुजरातमध्ये गुजराती, महाराष्ट्रात मराठी, केरळमध्ये केरळची भाषा आहे. मात्र मी पाहतोय महाराष्ट्रात जे एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखलं जातं, जे आर्थिक राजधानीचंही शहर आहे. या ठिकाणी खूप लोक रोजगारासाठी येत असतात. सध्या मनसेकडून जे लोक मराठीत बोलत नाहीत, त्यांना मारलं जात आहे.’’
तसेच ‘’मी मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधू इच्छित आहे, की हे ते परप्रांतीय लोक आहेत जे येथे विकासकामं करतात. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा कोविडचा काळ आला होता तेव्हा लोक मुंबई सोडून, महाराष्ट्र सोडून आपल्या आपल्या गावी गेले होते. तेव्हा येथील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाले होते. मग त्यांना परत आणण्यासाठी विमान,रेल्वे तिकीट, बस येथून पाठवली जात होती आणि सांगितले जात होते की तुम्ही लवकर या लवकर या विकासकामं थांबली आहेत. म्हणजे विकासकामात यांचा फार मोठा सहभाग आहे.’’ असं आझमींनी म्हटलं आहे.
तर ‘’परंतु अशाप्रकारे गुंडागर्दी करणं, परप्रांतीयांना मारणं आणि सांगणं की तुम्हाला मराठीतच बोलावं लागेल. मी विचारतोय की, हा काय कुठला कायदा बनला आहे का? ठीक आहे जर मराठी बोलणं आवश्यक आहे, तर मग त्यांना मराठी शिकवा. ते जर मराठी येथून शिकलेले नाहीत, बाहेर त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि तात्पुरतं येथे काम करण्यासाठी आलेले आहेत. अशाप्रकारे यांच्यावरील बळजबरी, अत्याचार वाढत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि जे कुणी हे काम करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.’’ अशी मागणी आझमींनी केली आहे.
याचबरोबर ‘’मीरा रोडवर जे झालं त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. फोटो देखील आहेत अन् पोलिसांनाही माहिती आहे तरीही पोलिसांना त्यांच्यावर कारवाई न करता अज्ञातांविरोधात केस केली. हे वर्षानुवर्षे चालत आलं आहे. कधी मराठी आणि हिंदीबाबत, कधी परप्रांतीय अन् महाराष्ट्राबाबत असे प्रकार घडत आहेत.’’ असं आझमींनी बोलून दाखवलं.
याशिवाय, ‘’मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना म्हणेण की संसदेत हा मुद्दा उचलून धरावा. एकीकडे संसदेत एक समिती आहे, जी हिंदीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी काम करते, की देशात हिंदीत काम व्हावे. केंद्र सरकारची कामं हिंदीत होतात आणि दुसरीकडे या देशातील नागरिकांना मारलं जात आहे, अपमानित केलं जात आहे. रिक्षावाल्यांना मारलं जात आहे. जर यांना मारायचंच आहे तर मोठ मोठ्या कॉर्पोरेट्सवर ज्यांची संपूर्ण देशभरात कार्यालयं आहेत, मुख्यालये मुंबईत आहेत, यांच्याकडून मराठी बोलून घ्या ना. तुम्ही त्यांना काही म्हणणार नाहीत. तुम्ही रिक्षावाले, फेरावाले जे बिचारे पोट भरण्यासाठी आले आहेत त्यांनाच माराल.’’ असं म्हणत एकप्रकारे आझमींनी मनसेला ललकारलं आहे.
अखेर ‘’मुख्यमंत्री महोदय याकडे लक्ष देवून याविरोधात तुम्ही एक कडक पाऊल उचलला आणि अशा लोकांविरोधात केस दाखल झाली पाहिजे, अन् त्यांचं तोंड बंद झालं पाहीजे.’’ अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे आझमी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.