मुंबई

Badlapur School Crime : राज ठाकरे आले रिकाम्या खुर्च्या पाहिल्या अन् १० मिनिटांत बदलापूर दौरा आटोपला

Raj Thackeray: घटनेमुळे अवघे बदलापूर पेटून उठले. यादरम्यान राज ठाकरे हे विदर्भातील दौऱ्यावर होते.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: बदलापूर घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी बदलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या पालकांशी, मनसे महिला पदाधिकारी, महिला पत्रकार यांच्याशी संवाद साधला. स्थानिक पोलीस व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलण्यास ते परत फिरले ते थेट मुंबईलाच गेले. अवघ्या दहा मिनिटांत राज यांचा दौरा आटोपल्याने या दौऱ्याचे फलित नेमके काय असा सवाल बदलापूरकर उपस्थित करत आहेत.

बदलापूर येथे एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचाराची घटना घडली. मनसे पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण समोर आणत शाळेतील हा प्रकार उघड केला होता. या घटनेमुळे अवघे बदलापूर पेटून उठले. यादरम्यान राज ठाकरे हे विदर्भातील दौऱ्यावर होते.

तेथून त्यांनी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करत राज यांनी पिडीत कुटुंबाशी संवाद साधला होता. बदलापूर आंदोलना दरम्यान अनेक स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व उस्फुर्त आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची ही धरपकड सुरूच आहे. या आंदोलनात रेल रोको केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून त्यात रात्री बेरात्री नागरिकांना उचलून नेलं जात असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर राज हे 26 तारखेला आंदोलनात सहभागी असलेल्या पालक आणि बदलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी येणार होते. मात्र 26 तारखेला नियोजित केलेला त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या उलट सुलट चर्चा नंतर राज हे 28 तारखेला बदलापुरात येणार असे पुन्हा निश्चित करण्यात आले. त्यानुसार राज दुपारी पावणे एकच्या सुमारास बदलापुरात दाखल झाले. नियोजित कार्यक्रम स्थळी आल्यानंतर अर्ध्याहून रिकामा हॉल त्यांनी पाहिला.

त्यांनी थेट पुढे बसलेल्या पालकांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशा आंदोलकांशी चर्चा केली. त्या अनुषंगाने राज यांनी रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच कुणालाही त्रास होता कामा नये, असं आवाहन केलं. त्याचबरोबर शिवसेनेचे स्थानिक नेते वामन म्हात्रे यांनी अर्वाच भाषा केली त्या महिला पत्रकाराशी त्यांनी चर्चा केली.

त्यानंतर या प्रकरणात स्थानिक पोलिसांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी म्हणून राज माघारी फिरले, ते परत आलेच नाहीत. त्यांनी तडक मुंबईचा रस्ता गाठला. त्यामुळे सकाळपासून ताटकळत बसलेले पालक, बदलापूरकर व मनसेचे पदाधिकारी यांच्यात संवाद झालाच नाही. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास राज यांनी नकार दिला.

अवघ्या दहा मिनिटात उरकलेल्या राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलित काय ? असा प्रश्न राज निघून गेल्यानंतर सर्वसामान्य बदलापूरकर विचारत होते. तर मनसेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे चेहरे बरंच काही सांगून जात होते.

राज ठाकरे अडकले वाहन कोंडीत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बदलापूरला जाण्याआधी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या पलावा येथील योगीराज कार्यालयात गेले. तेथून बदलापूर पाईपलाईन महामार्गाने त्यांनी बदलापूरच्या दिशेने प्रवास केला. यावेळी बदलापूर महामार्गावरील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहन कोंडीचा फटका हा राज यांच्या ताफ्याला देखील बसला. कार्यक्रम स्थळी राज हे काहीसे उशिरा पोहोचले होते

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT