बदलापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. रेल्वे स्थानक बंद ठेवण्यात आले असून लोकल गाड्याही रोखण्यात आल्या आहेत. या घटनेवर संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी यावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे म्हणाले की, “देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत, पण आता याला राजकारणासाठी वापरण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.”
या घटनेनंतर लोकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तक्रार दाखल करण्यासाठी ११ तासांचा विलंब झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी न्याय प्रक्रियेतील विलंबावरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाचा उल्लेख करत म्हटले की, "अशा जघन्य प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेला विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे." त्यांनी असेही म्हटले की, "हातरस, उन्नाव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे."
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात आणण्यात आलेल्या शक्ती विधेयकाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. त्यांनी म्हटले की, "आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो, पण कोरोनामुळे विधानसभेचे अधिवेशन दोन ते तीन दिवसांचे झाले होते, त्यामुळे हे विधेयक रखडले." ठाकरे यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, "आता त्यांनी हे विधेयक रखडवले आहे, हे विधेयक मांडून या रॅपिस्टना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे."
उद्धव ठाकरे यांनी असेही म्हटले की, "बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचे मला समजले. मात्र, त्यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही. थोरात कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे."
"लाडकी बहीण योजना आणत असताना लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. जर का हा भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून सोडून देणार आहात का?" असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
या घटनेवर आदित्य ठाकरे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "मी हे आधीही बोललो होतो आणि पुन्हा सांगतो, बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या!" आदित्य ठाकरे यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रातील प्रलंबित शक्ती विधेयकाला मंजुरी देण्याची मागणी राष्ट्रपतींना केली आहे.
बदलापूरमधील या दुर्दैवी घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की सरकार या प्रकरणात कितपत कठोर पावले उचलते आणि शक्ती विधेयकाला लवकरात लवकर मान्यता मिळते का.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.