मुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतही या आजाराने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या आजारावरील प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. स्वाइन फ्लूसंदर्भात प्रभावीपणे जनजागृती होण्याकरिता विविध माध्यमांचा वापर करतानाच विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेयस्तरावर जनजागृती मोहीम घेणे, यात्रा, उत्सव, आठवडे बाजाराच्या ठिकाणी आरोग्य शिक्षण देणे आदी सर्वंकष कृती योजना फेब्रुवारी महिन्यात अमलात आणण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागासह महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. जानेवारी ते आतापर्यंत या काळात सुमारे तीन लाख 50 हजार रुग्ण तपासण्यात आले आहेत. त्यापैकी चार हजार रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लूच्या 145 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, सोलापूर या ठिकाणी 10 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुरेसा औषधसाठा राज्यातील ग्रामीण भागात यात्रा, जत्रा आणि उत्सवांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी स्वाइन फ्लूसंदर्भात जनजागृती करण्याकरिता मोहीम हाती घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात असून, प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूवरील प्रतिबंधात्मक असलेल्या टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. |