डोंबिवली : कल्याणमधील शाळा व्यवस्थापकासह त्याच्या कुटूंबावर झालेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील काही आरोपींना अद्याप अटक झाली नसून, त्यांच्यामुळे आमच्या जीवितास धोका आहे. याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी व्यवस्थापकाने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे केली आहे.
कल्याण पश्चिमेत राहणारे गिरी सोमय्याजुला हे त्यांच्या कुटुंबासह काटे मानिवली परिसरातून जात असताना संदीप हॉटेल वानी विद्यालय ते शांतीभवन वृद्धाश्रम दरम्यान त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी 14 ऑक्टोबरला प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या सहाय्याने खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत, यात आठ जणांना अटक केली. शाळेच्या मालकी हक्काच्या वादातून गिरी यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती तपासात पुढे आली होती.
या मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. यात आणखी काहीजणांचा समावेश असून, ते मोकाट फिरत आहेत. यात एक महिला आरोपी असून, तिचा जामीन अर्ज न्यायप्रविष्ट आहे. काहीजणांकडून आमच्यावर पाळत ठेवली जात असून, काहीजण धमकावत आहेत. आमचे कुटुंब भीतीच्या छायेखाली वावरत असल्याकडे सोमयाजुला यांनी लक्ष वेधले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.