मुंबई : मुंबईतील कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला एकच चित्र दिसेल, की सगळे बेड पेशंटने भरलेले आहेत. काही सरकारी हॉस्पिटलमध्ये तर पेशंटना बेड उपलब्ध नसल्याने, त्यांना खाली जमिनीवरच अंथरूण टाकावे लागत आहे. ही स्थिती आली आहे साथीच्या आजारांमुळे. यात सध्या सगळ्यात आघाडीवर आहे फ्ल्यू. डॉक्टर्स सांगतात, की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इन्फ्ल्यूएन्झाच्या केसेसे जवळजवळ वीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांतल्या हॉस्पिटलांत या फ्ल्यूच्या पेशन्टची रिघच लागली आहे. त्यामुळे हॉस्पिटले हाऊसफुल झाली आहेत. यात ब्रीच कॅंडी, लीलावती, भाटिया, हिंदुजा, कोकिळाबेन, हरकिसनदास, फोर्टिस यांसारख्या पॉश हॉस्पिटलांचाही समावेश आहे. ताप, खोकला आणि अंगदुखी ही फ्ल्यूची लक्षणे सांगितली जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा आजार पूर्वी घरी उपचार घेऊन आणि आराम करून बरा होत असे. पण आता फ्ल्यूच्या व्हायरसची नवी जात आली आहे. हा आजार लवकर बरा होत नाही. म्हणून पेशन्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पावसाळ्यात साथीच्या आजारांत चांगलीच वाढ झाली आहे. जुलैमध्ये लेप्टोमुळे एकाचा आणि डेंगीमुळे एकाचा मृत्यू झाला होता. त्या एका महिन्यात मुंबईत डेंगीचे सतराशे पेशन्ट आढळून आले. स्वाईन फ्ल्यूमुळे मुंब्रा आणि डोंबिवलीतील दोन रहिवाशांचा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. जुलैमध्ये मलेरियाचे 351, लेप्टोचे 62, स्वाइन फ्ल्यूचे 113, गॅस्ट्रोचे 894, तर डेंगीचे 21 रुग्ण आढळल्याची आकडेवारी पालिकेने दिली आहे. |