मुंबई : नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई पालिका प्रशासन करत असले तरी शहर-उपनगरांतील अनेक नाल्यांमध्ये अद्याप गाळ आणि कचरा तसाच आहे. मालाड येथील अप्पा पाडा नाल्याचीही अद्याप सफाई झालेली नाही. पाऊस राज्याच्या वेशीवर पोचला असला तरी प्रशासनाने त्यासाठी पावले उचललेली नाहीत. पालिका प्रशासन दर वर्षी नाल्याच्या सफाईचा फार्स करते. ही सफाई पूर्णपणे कधीच होत नाही, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या परिसरातील नाल्यांमध्ये कचऱ्याबरोबरच सर्रास मलजलही सोडले जाते. त्यामुळे परिसराला नेहमीच आजारांचा धोका असतो, असेही काही नागरिकांनी सांगितले.
नाल्याची सद्यस्थिती
लांबी : सुमारे पाच किलोमीटर
मार्ग : अप्पा पाडा, दुर्गानगर, भीमनगर, गांधीनगर, आनंदनगर, पश्चिम द्रुतगती मार्गावरील पोयसर पुलावरून अरबी समुद्राला मिळतो.
नाल्याच्या सफाईवर मी लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रनगर, क्रांतीनगर ते गोकुळनगरपर्यंतच्या नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे. अन्य ठिकाणी काम सुरू आहे.
- आत्माचार चाचे, नगरसेवक
क्रांतीनगर परिसरात नाल्याची सफाई झाली असली तरी गाळ तसाच पडून आहे. त्यामुळे पावसात हा गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे. अन्य ठिकाणी सफाई झालेली नाही. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही परिसरात पाणी तुंबण्याची भीती आहे.
- वैभव भराडकर, पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस
पोयसर नदीचा उगम आप्पा पाडा परिसरात होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा नाला नसून नदी आहे. नदीच्या पायाला कॉंक्रीटीकरण करणे गरजेचे नव्हते. कॉंक्रीटीकरणामुळे पाण्याचा नैसर्गिक स्रोत नष्ट झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र देण्यात आले आहे.
- तेजस शहा, सदस्य, नदी बचाओ समिती
दर वर्षी गाळ काढण्याचा फक्त देखावा केला जातो. थोडा फार गाळ किनाऱ्यावर काढला जातो. अन्य गाळ कागदावरच काढला जातो. त्यामुळे परिसरात पावसाळ्यात पाणी भरण्याची भीती असते.
- सुरेश यादव, रहिवासी, क्रांतीनगर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.