मुंबई : संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. दिल्ली राजधानी असली तरी, महाराष्ट्रउ दिल्लीचा गुलाम नाही, ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी दिली, असं सांगत आज, सामना या शिवसेनेच्या मुखपत्राने विजयोत्सवाचा अग्रलेख प्रसिद्ध केलाय. महाराष्ट्रात सुराज्याचा उत्सव सुरू झालाय. त्यात सामील व्हा, असं अग्रलेखात म्हटलंय. भगव्याशी वैर घ्याल तर स्वतःचेच नुकसान करून घ्याल, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. तसेच फडणवीस सरकारने राज्यावर कर्ज लादल्याची टीकाही अग्रलेखात आहे.
महाराष्ट्रातील गेल्या महिनाभरातील नाट्यमय घडामोडींनंतर काल शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरेंचा शपथविधी म्हणजे, आपलं सरकार सत्तेवर आल्याची प्रत्येकाची भानवा आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
केंद्रानं सहकार्यासाठी हात पुढं करावा
अग्रलेखात म्हटले आहे की, आज, महाराष्ट्रातील राजकारण देशासाठी मार्गदर्शक बनले आहे. महाराष्ट्रातील राजकारण ही एक चळवळ असते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्य आणि न्यायाच्या कसोटीवर खरे उतरेल आणि स्थिर होईल. महाराष्ट्रावर फडणवीस सरकारने तब्बल पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले आहे. त्यामुळं आता नव्या सरकारला वेगानं त्याचवेळी सावध पावलेही उचलावी लागतील. पंतप्रधान मोदींनी सरकारला शुभेच्छा दिल्या असल्या तरी, राज्यातील शेतकऱ्याला सावरायचं असेल तर, केंद्रानं सहकार्याचा हात पुढं करायला हवा. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावांचे आहे. त्यामुळं लहान भावाला पंतप्रधान म्हणून, साथ देण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींची आहे. पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात, महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयाचा दिल्लीने मान राखायला हवा. सरकारच्या स्थैर्याला बाधा येईल, असे कृत्य घडणार नाही, याची काळजी दिल्लीने घ्यावी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.