बचावकार्याची मदार तरुणांच्या खांद्यावर
एनडीआरएफच्या पथकाकडून स्थानिकांना प्रशिक्षण; आपत्काळासाठी मिळणार त्वरित मदत
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, यासाठी स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवला जात आहे. महाड येथे दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाकडून जिल्ह्यातील तरुणांना दरड कोसळणे, पूर किंवा अपघात घडल्यास कशा प्रकारे बचाव मोहीम राबवावी, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे.
दुर्गम भागात घडलेल्या दुर्घटनेच्या वेळी एनडीआरएफचे पथक किंवा सरकारी यंत्रणा पोहोचण्यास उशीर होतो. अशा वेळी बचाव कसा करायचा, याबाबतची प्राथमिक माहिती असणाऱ्या तरुणांची मदत मोलाची ठरते. जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांमध्ये स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीत अनेकांचे प्राण वाचले आहेत. हे लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तरुणांचे एक सक्षम पथक असावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी महाड येथे एनडीआरएफचा २५ सदस्यांचा एक बेस कॅम्प सुरू करण्यात आला आहे. पथकातील सदस्य गावागावात जाऊन तरुणांना बचावकार्य कसे राबवावे, याबाबतचे प्रशिक्षण देत आहेत. यातून एनडीआरएफच्या पथकाला जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, येथील उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यांची तीव्रता यांची माहिती होण्यासही मदत होत आहे. त्याचबरोबर पथकातील सदस्यांचा स्थानिकांशी सुसंवादही घडवला जात आहे.
दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असल्याने पथकाकडे प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ आहे. या वेळेत एनडीआरएफचे पथक गावातील तरुणांना बचावकार्याची माहिती देत आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत अनेक बचाव पथके कार्यरत आहेत. काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण आणि त्यांची तीव्रताही जास्त असते. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांचा वारंवार सामना करावा लागतो. अशा गावांपर्यंत प्रशिक्षित बचाव पथक किंवा एनडीआरएफच्या पथकाला त्या गावापर्यंत पोहोचण्यास काही वेळ लागतो. यासाठी गावातील तरुणांचा एक प्रतिसाद गट स्थापन करून त्याच्याकडून आपत्तीची माहिती काही वेळातच प्रशासकीय यंत्रणेला मिळण्यास मदत होणार आहे.
आपत्ती निवारण दल अधिक सक्षम
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २०१९मध्ये जिल्ह्यात ‘आपत्ती निवारण दला’ची स्थापना केली होती. दलात जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या खालापूर येथील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, यशवंती हॅकर्स, कोलाड येथील ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्टस, पेण येथील जल जीवरक्षक संस्था, उरण येथील सोशल ॲण्ड डिझास्टर मॅनेजमेंट अवेरनेस असोसिएशन, मोरया सामाजिक संस्था, हॅम रेडिओ हॉबी क्लब, महाडमधील सिस्केप संस्था, सह्याद्री रेस्क्यू फोर्स यांच्यासह सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचा सहभाग होता. या संस्थांना बचावकार्यासाठी आवश्यक साधने सरकारकडून दिली जातात. बचावकार्यात सातत्याने मदत करणाऱ्या संस्थांचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीने करून त्यांचे मानसिक मनोबळ वाढवले जाते. या दलामध्ये एनडीआरएफच्या टीमकडून नव्याने प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांचाही समावेश होणार असल्याने हे दल अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
आपत्तीच्या वाढत्या घटना
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तींबरोबरच रस्ते अपघात, पाण्यात बुडून मृत्युमुखी, वाहून जाणे, दरीमध्ये कोसळणे, वणवे लागणे, कंपन्यांमध्ये आग लागणे अशा घटना सातत्याने घडत असतात. या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. या घटनांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात बचाव मोहीम राबवणे खूपच गरजेचे असते. यातून जीवितहानी टाळण्यास मदत होते. यासाठी गावातील तरुण पुढाकार घेऊन ही मोहीम राबवतात. मात्र अनेक वेळा त्यांना योग्य प्रशिक्षण नसल्याने अडचणी येतात. काही वेळेला बचावकार्यातील तरुणाला प्राण गमवावा लागतो. असे होऊ नये म्हणून मदतीसाठी जाणाऱ्यांना बचावकार्याची माहिती असावी, यासाठी एनडीआरएफच्या पथकाचे प्रशिक्षण उपयोगी पडणार आहे.
मदतीसाठी पहिली धाव मोलाची
तळिये दरड दुर्घटना, महाडचा पूर किंवा इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत बचावकार्यासाठी सर्वात पहिली धाव स्थानिक तरुणांनीच घेतली होती. त्यांनी केलेल्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचले होते. त्यानंतर या तरुणांनीच दुर्घटना घडल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला दिली होती. गावातील तरुणांना तेथील भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्तीच्या कक्षेत राहणाऱ्या तरुणांचा एक तीव्र प्रतिसाद गट तयार केलेला आहे. या गटाकडे सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यामुळे बचावकार्यात स्थानिक तरुणांनी घेतलेली पहिली धाव मोलाची ठरत आहे.
सध्या पावसाचा जोर कमी असल्याने गावोगावी जाऊन एनडीआरएफचे पथक लोकांमध्ये आपत्तीबद्दल जनजागृती करीत आहे. त्याचबरोबर स्थानिक तरुणांना बचावकार्याबद्दल प्रशिक्षणही देत आहे. बचावकार्यात मदत करणाऱ्यांना आवश्यक साहित्य दिले जाते. त्याचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण तरुणांना नक्कीच फायद्याचे ठरेल. स्थानिक तरुणांचा सहभाग बचावकार्यात नेहमीच मोलाचा राहिला आहे. हा सहभाग वाढवून आपत्तीपासून होणारी हानी कमी करण्यात नक्कीच मदत होईल.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.