गणेशोत्सवकाळातील परीक्षा रद्द करा : अमित ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे; मात्र तरीही काही खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये उत्सवाच्या काळात परीक्षा ठेवण्यात आल्याची तक्रार आमच्याकडे आल्या आहेत. यामुळे गणेशोत्सवादरम्यान परीक्षा जाहीर केल्या असतील तर त्या ताबडतोब रद्द करा, अन्यथा मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिला आहे.
अमित ठाकरे यांनी शनिवारी (ता. २३) माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या काळात परीक्षा होऊ नयेत; मात्र काही खासगी शाळा आणि महाविद्यालयांनी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे. कोकणातून बरेच लोक आपल्या गावी जातात. पालक गावी आणि मुले परीक्षेसाठी मुंबईत अडकली, तर घरात तणाव निर्माण होतो. उत्सव हा सर्वांचा आहे, तो आनंदात साजरा व्हायला हवा. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. दरम्यान, आशीष शेलार यांच्या भेटीवर बोलताना त्यांनी सांगितले, की राजकीय टीका असते, दुरावा कधीच नाही. आशीष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जुने मैत्रीचे संबंध आहेत. कधी टीका झाली, तर ती फक्त राजकीय असते, वैयक्तिक दुरावा कधीच नसतो, असेही त्यांनी सांगितले.
‘मुंबईला पर्याय फक्त राज ठाकरे’
मुंबईतील खड्ड्यांवरूनही अमित ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अडीच हजार खड्डे फक्त पाच दिवसांत पडले आहेत. मुंबईकरांचे हाल होत आहेत. किती सरकारे आली-गेली; पण समस्या कायमच आहे, नाशिकमध्ये लोकांनी संधी दिली आणि विकास पाहिला. आता मुंबईला पर्याय एकच राज ठाकरे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.