दिवाळीच्या आनंदात आगीची ठिणगी
मुंबईत दुर्घटनांचे सत्र; सहा दिवसांत तब्बल २५ आगीच्या घटना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : दिवाळीमध्ये मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फटाके, शॉर्टसर्किट आणि विजेच्या उपकरणांमुळे गेल्या सहा दिवसांत तब्बल २५ पेक्षा अधिक आगीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. या सर्व घटनांवर मुंबई अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून मोठी जीवितहानी टाळली असली तरी काही ठिकाणी मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे.
मुंबईत केवळ सहा दिवसांत २५ आगीच्या घटना, एक मृत्यू, १० हून अधिक जखमी आणि शेकडो घरांचे नुकसान झाले असून, दिवाळीचा प्रकाश अनेक ठिकाणी धुरात हरवला. यातील पाच घटना या मोठ्या आहेत, तर काही इतर अपघातदेखील आहेत.
मालाड (पूर्व) पठाणवाडी परिसरात १८ ऑक्टोबरला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे १५ ते २० गाळे जळून खाक झाले. वरळीतील महाकाळी नगरात १९ ऑक्टोबर रोजी मीटर रूममध्ये लागलेल्या आगीने सात ते आठ झोपड्या भस्मसात झाल्या.
कफ परेड (मच्छीमार नगर) येथे २० ऑक्टोबर रोजी पहाटे लागलेल्या आगीत १५ वर्षीय यश विठ्ठल खोत या मुलाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मालाड (पश्चिम) येथील भूमी क्लासिक इमारतीत २२ ऑक्टोबर रोजी सकाळी लागलेल्या आगीत फर्निचर, एसी, फ्रिजसह घरगुती साहित्य जळाले. एका अग्निशमन जवानाला किरकोळ दुखापत झाली.
बोरिवलीतील गोराई नालंदा सीएचएस परिसरात २२ ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीत पूजा पारख (३७) या महिलेचा मृत्यू झाला. दोन पुरुषांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले.
जोगेश्वरी (पश्चिम) येथील जेएनएस बिझनेस सेंटरच्या १३ मजली इमारतीत २३ ऑक्टोबर रोजी मोठी आग लागली. नवव्या ते १२व्या मजल्यावर आगीचा प्रभाव होता. अग्निशन दलाच्या तातडीच्या कारवाईने आग नियंत्रणात आणण्यात आली आणि शेकडो कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
दिवाळीची धामधूम सुरू असतानाच मदनपुरा आणि चिराबाजार परिसरात दोन इमारती अंशतः कोसळल्या असून, एकूण नऊ जण जखमी झाले आहेत, तर अक्सा बीचवर चार तरुण पोहण्यासाठी गेले असता, एक तरुण बेपत्ता झाला असून, शोधमोहीम सुरू आहे.
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने सांगितले की, १५ ते २३ ऑक्टोबरदरम्यान म्हणजे केवळ सहा दिवसांत २५ पेक्षा जास्त ठिकाणी आग लागल्याचे कॉल प्राप्त झाले आहेत. बहुतेक ठिकाणी शॉर्टसर्किट, दिव्यांच्या वायरिंगमधील त्रुटी किंवा फटाक्यांच्या ठिणग्या हे कारण आढळले आहे.
स्वतःची काळजी घ्या!
दिवाळीचा सण आनंदाने साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. फटाके वापरताना आणि विजेच्या उपकरणांशी संबंधित वायरिंग तपासा. प्रत्येक ठिणगी आगीची नव्हे तर आनंदाची असावी. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.