रक्तपेढ्या ३० वर्षांसाठी पीपीपी तत्त्वावर
प्रस्ताव स्थायी समितीपुढे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबई महापालिकेच्या ताब्यातील तीन विद्यमान आणि दोन प्रस्तावित रक्तपेढ्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ३० वर्षांसाठी चालवण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून तो लवकरच स्थायी समितीकडे मांडला जाणार आहे. या योजनेअंतर्गत महापालिका जागा विनामूल्य उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी समाविष्ट असलेले एम. टी. अगरवाल रुग्णालय मात्र यादीतून वगळण्यात आल्याचे समजते.
आरोग्य व्यवस्थेतील अत्यावश्यक सेवा म्हणून रक्तपेढ्यांना विशेष महत्त्व आहे. अशा सेवांसाठी ३० वर्षांचा दीर्घकालीन करार देताना पारदर्शकता, दर नियंत्रण, गरीब रुग्णांवरील परिणाम आणि प्रशासकीय देखरेख, याबाबत प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समिती या प्रस्तावाला मंजुरी देते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या संस्थेकडे कोणती रक्तपेढी?
प्रस्तावानुसार, नवजीवन मेडिकल रिलीफ अँड रिसर्च फाउंडेशनकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय कांदिवली, राजावाडी रुग्णालय घाटकोपर, भगवती रुग्णालय बोरिवली, भाभा रुग्णालय कुर्ला या चार रक्तपेढ्या देण्याचा प्रस्ताव आहे. तर चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशनकडे भाभा रुग्णालय वांद्रे सोपवण्यात येईल.
राजकीय वादाची शक्यता
रक्तपेढ्यांचे खासगीकरण रोखण्याचे आश्वासन काही लोकप्रतिनिधींनी यापूर्वी दिले होते. त्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीत आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र चर्चा होण्याची चिन्हे आहेत.