रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ
मुंबई, ता. २८ : उन्हाळी सुट्ट्या सुरू होत असल्याने गावाकडे जाणे तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने १० उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०९०७५/७६ मुंबई सेंट्रल-काठगोदाम उन्हाळी विशेष गाडीच्या फेऱ्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच ट्रेन क्रमांक ०९१८५/८६ मुंबई सेंट्रल-कानपूर अनवरगंज उन्हाळी विशेष गाडीचा कालावधी २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय ट्रेन क्रमांक ०९००५/०६ वांद्रे टर्मिनस-भिवानी विशेष गाडी ३० जुलैपर्यंत चालवण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेनेही अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एलटीटी-धनबाद विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ट्रेन क्रमांक ०३३८० एलटीटी-धनबाद साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच ट्रेन क्रमांक ०३३८९ धनबाद-एलटीटी साप्ताहिक विशेष गाडी ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. या मुदतवाढ दिलेल्या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण २९ मार्चपासून भारतीय रेल्वेच्या सर्व ‘पीआरएस’ आरक्षण केंद्रांवर तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली.