ठाण्यात १४ हजार तक्रारींचा निपटारा
पोलिसांकडून तक्रार निवारणदिनी सल्ला मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : वेगवेगळ्या वादविवादांतून समोरच्या व्यक्तीला अद्दल घडविण्यासाठी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज केले जातात. अशा किंवा इतर तक्रार अर्जांचा पोलिस ठाण्यांमध्ये ढीग लागत असतो. यासाठीच सुरू केलेल्या तक्रार निवारणदिनी म्हणजे गेल्या तीन महिन्यांत १४ हजारांहून अधिक लेखी तक्रार अर्ज मार्गी लावण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये काही तक्रारी या दिवाणी आणि अदखलपात्र स्वरूपाच्या असल्याने त्या तक्रारदारांना त्याबाबत योग्य मार्गदर्शन करून तसा सल्लाही दिला जात आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्ष तक्रार निवारण करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या अर्जदारांपैकी प्रत्यक्ष हजर राहणाऱ्या अर्जदारांचे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील पाच परिमंडळांत एकूण ३५ पोलिस ठाणी आहेत. शिवाय छोट्या छोट्या गोष्टी या पोलिसांनी सोडवाव्यात अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते. त्यातूनच लेखी तक्रार अर्ज येत असतात. अशा प्रकारे प्रत्येक पोलिस ठाण्यात दिवसाला सुमारे ४५ ते ५० लेखी तक्रार अर्ज दाखल होतात. पण कायदा व सुव्यवस्था, दिवसाला घडणारे गुन्हे तसेच न्यायालयाच्या कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या पोलिसांना त्या अर्जांचा निपटारा करणे शक्य होत नाही. त्यातच तो तक्रारदार पोलिस ठाण्यात तक्रार करून थांबत नाही, तर तो थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून पोलिस आयुक्त यांच्याकडेही लेखी अर्ज करून तक्रार करीत असतो. त्यामुळे अर्जाचे ढीग लागतात. या वाढत्या लेखी तक्रार अर्जांमुळे त्यांचा निपटारा करण्याचा ताण कळत-नकळत पोलिसांवर येत आहे.
शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा या कार्यक्रमाअंतर्गत ठाणे पोलिस आयुक्तालयात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी तक्रार निवारणदिनाचे आयोजन केले जात आहे. या दिवशी पोलिस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि इतर पोलिस अधिकारी उपस्थित राहून त्या तक्रारी मार्गी लावत आहेत.
-----------------------------------
अशी आहे आकडेवारी
ठाणे पोलिसांनी २ फेब्रुवारी २०२५ पासून आतापर्यंत २७ हजार ७१९ अर्जदारांना बोलावले होते. त्यापैकी १६ हजार ८५८ अर्जदार हजर राहिले. त्यांच्यापैकी १४ हजार २३९ अर्जदारांच्या तक्रारी तत्काळ सोडवल्या गेल्या, तर उर्वरित तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या असल्याने त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
---------------------------
सुट्ट्यांमुळे शनिवार-रविवारवर विशेष भर
शनिवारी आणि रविवारी बहुतेक जणांना सुट्ट्या असल्याने तक्रार निवारणदिनाचे या दिवशी आयोजन केले जात आहे. त्यातच या दिवशी कोर्ट कचेरीची कामे पोलिसांना कमी आल्याने पोलिसांसह अर्जदारांनाही हे दोन दिवस सोयीचे ठरतात. म्हणूनच या दिवशी तक्रार निवारणदिन आयोजित करून जास्तीत जास्त तक्रारी सोडविण्यावर भर दिला जात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.