बाप-लेकाचा तहसीलदारांकडून सत्कार
टिटवाळा, ता. २९ (बातमीदार) : उल्हास नदीला अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या तिघांचा जीव गाळेगाव येथील बाप-लेकाने धाडसाने वाचवला. त्यांच्या या शौर्याचा गौरव तहसीलदारांनी सत्कार करून केला; परंतु या संपूर्ण प्रकरणाने प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
गाळेगाव मोहिली परिसरातील दत्तू गायकर (वय ५५), शंकर पाटील (५५) आणि सावळाराम वाघे (६०) हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी नदीपात्रात गेले होते; मात्र उल्हास नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ते नदीच्या बेटावर अडकले. चारही बाजूंनी पाणी आणि वाढता पुराचा वेग त्यामुळे परिस्थिती अत्यंत भीषण बनली. त्यांनी आपली जनावरे बाहेर काढली; मात्र ते स्वतः अडकलेलेच राहिले. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगोळे यांनी तत्काळ तहसील प्रशासनाला दिली. माहिती मिळताच मंडळ अधिकारी चेतन पष्टे, अग्निशमन अधिकारी तडवी घटनास्थळी दाखल झाले; परंतु पुराचा वेग इतका प्रचंड होता, की सरकारी यंत्रणेतील कोणीही पाण्यात उतरण्याचे धाडस दाखवू शकले नाही. अखेर गाळेगावचे गुरुनाथ पवार आणि त्यांचा मुलगा रोहन पवार यांनी स्वतःच्या होडीसह जीव धोक्यात घालून पुराच्या प्रचंड प्रवाहात प्रवेश केला आणि तिघांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल तहसीलदार सचिन शेजाळ यांनी त्यांचा सार्वजनिक सत्कार केला.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न
प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची या घटनेने पोलखोल केली. आपत्ती काळात प्रशिक्षित बचाव पथक, आवश्यक उपकरणे, लाइफ जॅकेट, रेस्क्यू बोट्स यांचा अभाव का होता? आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठका, तयारी यांचा उपयोग काय? जर गुरुनाथ पवार आणि त्यांच्या मुलाचा जीव गेला असता, तर त्याला जबाबदार कोण? हा प्रसंग आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत असलेल्या हलगर्जीचे उदाहरण आहे. या धोकादायक परिस्थितीत बाप-लेकाने दाखवलेली तत्परता आणि धाडस नक्कीच वाखाणण्याजोगे आहे; पण त्याच वेळी प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित करणारे आहे. यापुढे अशा चुका होऊ नयेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शासनाने गंभीरतेने विचार करण्याची नितांत गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.