गल्लीबोळात फेरीवाल्यांचे राज्य
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) : एकीकडे फेरीवाला धोरण रखडले असतानाच प्रवाशांच्या हक्काच्या पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मुजोर फेरीवाले आणि नियोजनशून्य अधिकाऱ्यांमुळे ठाणेकरांचे पदपथ गायब झाले आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी शहरातील मुख्य भागात तयार केलेल्या पदपथांवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. इतर पदपथांवर दुरुस्तीच्या नावाने पालिकेच्या ठेकेदारांनी खोदकाम केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशातून खर्च करून बांधलेले पदपथ मोकळे करून द्यावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाणेकर देत आहेत.
ठाणे, मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील फेरीवाल्यांचा उपद्रव कमी करणे, तसेच त्यांच्या रोजगाराचे साधन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकांना फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र नागरिक आणि फेरीवाल्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय महापालिकांकडून दुर्लक्षित झाला आहे. ठाणे महापालिकेने तर अद्याप फेरीवाला धोरण आणलेले नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथांवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे.
सुरुवातीला ठाणे स्थानक परिसर, स्थानक रोड, नौपाडा परिसरातील पदपथ गिळंकृत करणारी मुजोर फेरीवाला संस्कृती आता थेट शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. ठाणे स्थानकापासून ते थेट घोडबंदरच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या पदपथावर फेरीवाले दिसू लागले आहेत. एकीकडे शहरातील लहान रस्त्यांसह मुख्य रस्त्यांवर रस्ते दुरुस्तीची आणि इतर कामे सुरू आहेत. या कामामुळे वाहतूक कोंडी होत असताना पदपथ गायब झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतुकीच्या रस्त्यावरून चालावे लागत आहे. सायंकाळी स्थानक रोड नौपाडा आदी ठिकाणी प्रचंड प्रमाणात फेरीवाल्यांची गर्दी असते. त्यातच रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते.
लाखोंच्या घरात फेरीवाले
अनेक वर्षांपासून फेरीवाला धोरण रखडले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाल्यांची संख्या अनेकपटीने वाढली आहे. या फेरीवाल्यांना हक्काची जागा देण्यासाठी फेरीवाला धोरण राबविण्यात येत असले तरी २०१९ मध्ये ठाणे महापालिकेने केलेल्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ सहा हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे केला होता, परंतु एका अंदाजानुसार फेरीवाल्यांची ही संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. मंदिर, शाळा, रुग्णालये अशा ठिकाणी फेरीवाल्यांना अश्रय देण्यात येऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही ठाणे महापालिकेच्या हद्दीत अशा ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे.
३० जणांची समिती स्थापन
ठाणे महानगरपालिकेकडून फेरीवाला धोरण राबवण्यासाठी ३० जणांची फेरीवाल्यांची समिती स्थापन केली आहे, परंतु आता पुन्हा नव्याने कमिटी तयार होणार असून, त्यात २० जणांचा समावेश असणार आहे. यात फेरीवाल्यांचे आठ प्रतिनिधी, पाच शासकीय प्रतिनिधी आणि उर्वरित हे सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.