विरार, ता. २२ (बातमीदार) : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पुलाप्रमाणेच वसईतील चिंचोटी पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना ५ मे रोजी पत्र पाठवून कार्यवाहीची मागणी केली होती.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला असलेल्या महापालिकेच्या प्रभाग क्र. ८९ मधील चिंचोटी नाका ते चिंचोटी गाव यांना जोडणारा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलापलीकडील चिंचोटी गावात १५ ते २० हजार ग्रामस्थ राहतात. या पुलावरून ग्रामस्थ, कामगारांच्या दुचाकी, विद्यार्थी आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. चिंचोटी येथे प्रसिद्ध चिंचोटी धबधबा हे पर्यटन स्थळ आहे. या धबधब्यात डुंबण्यासाठी, सहलीसाठी हजारो पर्यटक पावसाळ्यात येत असतात. त्यांची वाहनेही याच पुलावरून जातात. हा पूल जीर्ण आणि धोकादायक झाल्याने तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी म्हात्रे यांनी २०१९पासून सातत्याने सातत्याने केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्तीबाबत पत्राद्वारे ५ मे रोजी मागणी केली आहे. त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. अपघात झाल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडतील का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा बळी गेला. अशी घटना चिंचोटी पुलाबाबत घडण्यापूर्वी त्याची पाहणी करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी म्हात्रे यांनी वसई-विरार महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.