आवळेगावात पोलिसांची फौज तैनात
रास्ता रोकोप्रकरणी ४० जणांना घेतले ताब्यात
मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : कल्याण-माळशेज घाट रस्त्यावर शनिवारी (ता. २१) सायंकाळी केलेल्या रास्ता रोकोप्रकरणी पोलिसांनी ४० ग्रामस्थांना ताब्यात घेत त्यांना टोकावडे पोलिस ठाण्यात नेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शनिवारच्या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी रविवारी आवळेगाव येथे भेट दिली. या गावात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
कल्याण-माळशेज घाट रस्त्यावर मुरबाड तालुक्यातील आवळे गावाजवळ शनिवारी एका दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कायदा हातात घेत अनेक वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. तसेच माळशेज घाट रस्ता रोखून धरला होता. या वेळी पोलिसांना कारवाईपासून रोखले होते. यात काही पोलिसांचे गणवेशसुद्धा फाटले होते. या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने गावातील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या, तसेच संतप्त ग्रामस्थ पोलिसांना जुमानण्यास तयार नव्हते. पोलिसांची कुमक कमी असल्याने मुरबाड- किन्हवली येथून पोलिस मागविण्यात आले; परंतु पोलिसांना आंदोलकांवर कारवाई करणे शक्य झाले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी आवळेगाव येथे मोठ्या संख्येने पोलिस फौज तैनात केली होती. त्यामुळे अटकेच्या भीतीने गावातील ग्रामस्थ जंगलात पळून गेले. या अपघातात मृत्यू झालेल्या खंडू मेंगाळ यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी गावातील काही मोजकेच लोक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.