वाडा, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील घोणसई, मेट, डाकिवली, चांबळे या परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांसह उद्योजकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे ते अक्षरशः कंटाळले असून, महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत. दिवसभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने कारखाना चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
वाडा तालुक्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कारखान्याचे जाळे पसरले असून, एक हजाराच्या आसपास उद्योग आहेत, मात्र सरकारने कारखानदारांना सुविधा न पुरवल्याने उद्योजक हवालदिल झाले आहेत. यामध्ये भिवंडी-वाडा रस्त्याचा प्रश्न बिकट आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. घोणसई मेट परिसरात १८ जून रोजी रात्री १ वाजता वीज गायब झाली. ती १९ जूनला रात्री १० वाजता आली. त्यानंतर २० तारखेला पूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित होता. तो रात्री ९ वाजता सुरू झाला. आजचीही (ता. २३) परिस्थिती तीच आहे. रात्री मध्यरात्री गेलेली वीज आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आली. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांसह उद्योजक हैराण झाले आहेत.
घोणसई फिडरची विद्युतवाहिनी ही वारंवार नादुरुस्त होत असल्याने या परिसरात वीज गायब होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे त्यांना डाकिवली फिडरवर जोडण्यात आले आहेत. तिथे दाब जास्त असल्याने तीही नादुरुस्त होत असल्याने या भागात विजेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.
वरिष्ठांचे दुर्लक्ष
महावितरणचे कर्मचारी व अधिकारी हेही या समस्येकडे लक्ष देत नसल्याचा दावा कारखानदारांनी केला आहे. त्यांना दूरध्वनी केल्यास ते उचलत नाहीत, अशी माहिती कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी दिली. यासंदर्भात कुडूस महावितरणचे कनिष्ठ अभियंता अनिल पवार यांच्याशी संपर्क असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.