अलिबागमध्ये विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक
रिक्षा, मिनीडोरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाण; अपघाताची भीती
अलिबाग, ता. २ (वार्ताहर) ः शासनाच्या मोटार परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी नवे धोरण तयार केले आहे, मात्र अनेक शाळांकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवून ऑटोरिक्षा व मिनीडोअर अथवा इकोमधूनही मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सर्रास वाहतूक केली जात आहे. याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरिता राज्य सरकारने २०११ मध्ये नियमावली तयार केली आहे, मात्र तालुक्यामध्ये वाहतुकीबाबत ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांची वाहतूक ही खासगी वाहनांमधून होते. ही वाहतूक होत असताना नियमावलीचे पालन होताना दिसत येत नाही. काही इको व बसचालकांशी अनेक शाळांनी करार केले आहेत, मात्र असा करार न करणाऱ्या चालकांची संख्याही शहरात मोठी आहे. त्यामधून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते. अनेकवेळा विद्यार्थ्यांची दप्तरे वाहनांच्या बाहेर निघालेली दिसतात. बऱ्याचदा वाहनचालकांच्या शेजारी विद्यार्थ्यांना बसविले जाते. पालकही यास तितकेच जबाबदार आहेत. शाळांशी करार न झालेल्या वाहनांमधून ते त्यांच्या पाल्यांना पाठवून जीवघेणी जोखीम घेत आहेत. यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत, तर अशा प्रकारे अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मिनीडोअर तसेच इको चालकांकडे पोलिस प्रशासनदेखील दुर्लक्ष करत आहे.
.....................
चौकट
शालेय विद्यार्थी वाहतूक समिती कागदावरच :
विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक समिती स्थापन होणे अपेक्षित आहे. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक त्या समितीचे अध्यक्ष असतील, मात्र आतापर्यंत अशा समिती प्रभावीपणे स्थापन झालेल्या दिसत नाहीत. काही शाळांमध्ये समित्या आहेत, पण त्या प्रभावीपणे कार्यरत असल्याचे जाणवत नाही.
....................
चौकट
पुढील काही दिवसांत आम्ही याबाबत शाळा समितीच्या अध्यक्ष व मुख्याध्यापकांसह बैठक घेणार आहोत. शालेय विद्यार्थी वाहतूक समिती प्रत्येक शाळेत असणे गरजेचे असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर गांभीर्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांनी अशी समिती स्थापन केलेली नाही, त्यांना सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले.
...........
प्रतिक्रिया :
शासनाच्या मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार ऑटोरिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस आणि व्हॅनचालकांनी शाळांशी करार करणे गरजेचे आहे. जर खासगी व्हॅनमधून अथवा ऑटोरिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- महेश देवकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.