‘त्या’ विद्यार्थ्यांना वैफल्यग्रस्त होण्यापासून वाचवा
शिक्षण क्रांती संघटनेची केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे मागणी
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) ः देशातील लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन नीटसारख्या परीक्षेला सामोरे जातात. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचे इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होते. यामुळे सरकारच्या टक्केवारीची अट पूर्ण होत नाही. दुसरीकडे नीटमध्ये चांगले गुण मिळतात, परंतु साहजिकच त्याला बारावीमध्ये अपेक्षित टक्केवारी नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात जाता येत नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीची अट अमागास विद्यार्थ्यांसाठीही ठेवावी व त्या विद्यार्थ्यांना आत्महत्या तसेच वैफल्यग्रस्त होण्यापासून वाचवा, अशी आर्त हाक शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी दिली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा व राष्ट्रीय वैद्यकीय आयोग सचिव राघव लंगर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
संपूर्ण देशामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील गोरगरीब मुलांनी डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिलेले असते. याकरिता प्रवेश पात्रता परीक्षा नीटच्या टक्केवारीनुसार त्यांनी मेहनत घेतलेली असते. नीट परीक्षेमध्ये अधिक टक्के मिळवण्याच्या ध्येयामुळे काही मुलांनी बारावीच्या परीक्षेमध्ये किमान पात्रतेपेक्षा कमी गुण मिळतात. यामुळे ते वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेतून बाद होतात याचा परिणाम म्हणून अनेक मुले वैफल्यग्रस्त होऊन चुकीचे पाऊल उचलू शकतात. तसेच यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्यादेखील केली आहे.
अमागास वर्गीयांकडून मागणी
आरक्षणाची टक्केवारी (प्रमाण) सर्वमान्य आहेच, मात्र प्रवेशाची किमान पात्रता ही समान असावी ही बाबही सर्वमान्य असावी, अशी मागणी अमागास वर्गीयांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. खुल्या प्रवर्गातील (अमागास) विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या पीसीबी ग्रुपमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच किमान ४० टक्के गुणांची अट ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांच्या वतीने करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रतेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यर्थ्यांसाठी इयत्ता बारावीला पीसीबी ग्रुपमध्ये किमान ५० टक्के गुणांची अट आहे. ती शिथिल करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे ४० टक्के करावी. याबाबत तातडीने निर्णय झाल्यास यावर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण प्रवेशास पात्र ठरू शकतील व डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकतील, अशी विनंती केली आहे, असे सुधीर घागस शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.