मुंबईत पावसाची संततधार
रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम; सखल भागात पाणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईत सलग चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज पहाटेपासूनच पावसाने संततधार सुरू होती. परिणामी शहर आणि उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. त्यातच रेल्वे, रस्ते वाहतूकही मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले. हवामान विभागाने येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे व पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र आजच्या पावसाने मुंबईकरांचे हाल झाले. समुद्राला दुपारी मोठी भरती होती; मात्र या काळात अतिवृष्टी झाली नाही.
मुंबईसह शहरात शुक्रवारी (ता. २५) पहाटेपासून संततधार पाऊस सुरू होता. आठवडाभर सलग पावसाने दमदार हजेरी लावल्याने सखल भागात पाणी साचते आहे. आज मालाड, अंधेरी, दहिसर, कांदिवली, बोरिवली, वांद्रे, दादर टीटी, वडाळा, सायन गांधी मार्केट, परळ, चेंबूर शेल कॉलनी, कुर्ला, मानखुर्द, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, विक्रोळी आदी भागात पाणी साचले, तर अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. सलग चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. रेल्वेसेवा विलंबाने धावल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. मुंबई महापालिकेचे कर्मचारी मागील चार दिवसांपासून पाणी साचणाऱ्या ठिकाणी कार्यरत होते. या ठिकाणी पंप लावल्याने पाण्याचा निचरा वेळेत झाला.
उपनगरांत मुसळधार
उपनगर पाऊस (मि.मी.मध्ये)
जोगेश्वरी ६७
अंधेरी ६६
सांताक्रूझ ६५
वांद्रे ६५.२
घाटकोपर ५३.४
भांडुप ५७
विक्रोळी ५१.८
पवई ५२.६
सायन ३०.२
रावळी कॅम्प २२.३५
........
पावसाची नोंद
शहर १७.८० मि.मी.
पूर्व उपनगर ६८.४२ मि.मी.
पश्चिम उपनगर ६७.४३ मि.मी.
आज समुद्राला उधान (शनिवारी ता.२६)
दुपारी १. २० वाजता ४.६७ मीटर उंची
पडझडीच्या घटना
जोरदार पावसामुळे पूर्व उपनगरात तीन व पश्चिम उपनगरात एक अशा एकूण चार ठिकाणी घरे व घरांच्या भिंती कोसळल्या. शहरात पाच, पूर्व उपनगरात सहा व पश्चिम उपनगरात चार एकूण १५ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यात कोणतीही जीवितहानी वा कोणीही जखमी झाले नाही.
१० हजार कर्मचारी ऑन फिल्ड
सखल भागात पाणी साचल्यास त्याचा ताबडतोब निचरा करण्यासाठी पालिकेचे तब्बल १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध भागात तैनात आहेत. पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून शुक्रवारी (ता. २५) पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे, उपआयुक्तांनी याची खातरजमा करावी, असे स्पष्ट निर्देश गगराणी यांनी दिले. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४० उदंचन संच व्यवस्था करण्यात आली आहे. हे उदंचन संच कार्यरत राहावे, यासाठी पंपचालक तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.