अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा होणार गौरव
जन्मदिनी ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा हाेणार, लवकरच धाेरणात्मक निर्णय
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महाराष्ट्रातील थोर साहित्यिक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि कार्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून गौरव केला जाणार आहे. त्यांचा १ ऑगस्ट हा जन्मदिवस (जयंती) राज्यात ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जाणार असून, उच्च व तंत्रशिक्षण विभाग लवकरच धोरणात्मक निर्णयाचे आदेश जारी करणार आहे, अशी माहिती उच्चस्तरीय अधिकारी सूत्राने दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे राज्यात पहिल्यांदाच उच्च शिक्षण आणि राज्यातील विद्यापीठांसह संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांत अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या गौरवासाठी त्यांचा जन्मदिन ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून ओळखला जाणार आहे. या दिवसानिमित्त अण्णा भाऊंच्या साहित्यावर परिसंवाद, चर्चासत्रे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यासाठी धोरणात स्पष्ट आदेशही दिले जाणार आहेत.
महाराष्ट्राचे थोर लेखक, साहित्यिक म्हणून अण्णा भाऊ साठे यांची जगभरात ओळख आहे. त्यांच्या साहित्याने देशविदेशातील वाचकांना कायमच भुरळ पाडली आहे. त्यांचे साहित्य भारतीय भाषांसोबत इंग्रजी, रशियन, जर्मन इत्यादी भाषांमध्ये प्रसिद्ध आहे. आता त्यांच्या नावाने महाराष्ट्रात ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा केला जाणार असल्याने त्यांच्या साहित्यविषयक योगदानाचा सरकारकडून हा मोठा गौरव असेल, असेही सांगण्यात आले.
--
ज्येष्ठ साहित्यिकांची होती मागणी
अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या मागणीसाठी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, डॉ. बाबुराव गुरव, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. भारत पाटणकर, डॉ. यशवंत मनोहर, सुबोध मोरे आदींनी लेखन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी सरकारला पत्र पाठवले होते. तसेच या मागणीला राज्यातील विविध साहित्यिक संघटनांसह विद्यार्थी संघटनांनीही पाठिंबा दर्शविला होता. यंदा काही संघटनांनी याविषयीची मागणी केली होती. ती लवकरच पूर्ण हाेणार आहे.