गोविंदांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात २० बेडचा विशेष कक्ष
ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) : यंदा ठाणे जिल्हा रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी २० बेडचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा, औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
कोणताही गोविंदा अपघातग्रस्त झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, हा यामागचा मुख्य हेतू आहे. दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी उंच थर रचण्याची तयारी केली आहे. थर चढताना एकमेकांना हात देणे, खांद्यावर उचलणे आणि पडल्यास पकडून सावरणे – हीच खरी गोविंदा परंपरेची ओळख आहे. मात्र, एखाद्या घटनेत गोविंदा पडून जखमी होण्याची शक्यता असते. अशावेळी सिव्हिल रुग्णालयातील विशेष कक्ष मदतगार ठरू शकतो.
दहीहंडी हा केवळ शक्ती, कौशल्य आणि मैत्रीचा सण नाही, तर काळजी, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना जपण्याचं प्रतीक आहे. या उत्सवात प्रत्येक गोविंदाची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे दहीहंडीचा मनोरा लावताना कोणताही गोविंदा जखमी झाल्यास त्याच्यासाठी सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तैनात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली आहे.