खड्ड्यांमुळे चालकांचे मोडले कंबरडे
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; पालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका
अंबरनाथ, ता. २३ (वार्ताहर) : शहरातील रस्त्यांची दुर्दशा दिवसेंदिवस भीषण होत चालली असून, सर्वत्र रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे चालकांचे कंबरडे मोडले असून, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, उड्डाणपूल आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवरील खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. नागरिकांचे अनेक निवेदने, तक्रारी व पत्रव्यवहार करूनही नगरपालिकेकडून दुर्लक्षच केले जात असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच अंबरनाथच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रोजच्या वापरातील रस्त्यांवर मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जातो, चारचाकी वाहने अडखळतात आणि पाणी साचल्याने खड्डे दिसतही नाहीत. परिणामी अपघात होतात. काही नागरिकांना हाडांच्या तक्रारी तर काहींना अन्य आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांच्या सततच्या तक्रारी, पत्रव्यवहार आणि निवेदनांनंतरही नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष सुरूच आहे. अपघात झाल्यावरच पालिका जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. केवळ निवेदन घेणे आणि आश्वासन देणे इतक्यावरच कारभार मर्यादित राहिल्याचे आरोप होत आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना सुरक्षित, आरामदायी प्रवासाचा अनुभव द्यावा, अशी जोरदार मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
गणपती बाप्पाचे खड्ड्यांतूनच आगमन
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नागरिक आणि कार्यकर्ते मंडप उभारणीसाठी तयारी करीत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेशमूर्तींचे आगमनही धोक्याचे ठरू शकते. बाप्पाचे स्वागत खड्ड्यांतूनच करायचे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी पालिकेला विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.