रेल्वेसाठी कुटुंबासह २४ तास रांग
कोकणवासीयांचे ठाणे स्थानकात हाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : गणेशोत्सवासाठी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना यंदा प्रथमच तब्बल २४ तास कुटुंबासह रांगेत उभे राहावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार ठाणे रेल्वेस्थानकात घडतो आहे. शिवाय रांगा लागतात तेथे कोणतीही सुविधा नसल्याने या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. ‘यापूर्वी कधीही असे हाल झाले नव्हते. यंदा प्रथम रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) हस्तक्षेपामुळे हा मनस्ताप होत आहे,’ असा आरोप कोकणवासीयांनी बोलून दाखवला. गाड्या वेळेत सोडाव्या, अशी मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रेल्वेने रांगेची जबाबदारी सोपवलेल्या आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या तीन महिने आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरांत स्थायिक झालेल्या कोकणवासींना गावी जाण्याचे वेध लागतात. रेल्वे प्रवास सुखकर असल्याने लाखो गणेशभक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. कोकणात जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा, मंगळूर एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्या आहेत. मात्र तिकीट खिडकीवर पहिल्याच मिनिटाला सर्व आरक्षण फुल होत असल्याने अनेकांना जनरल बोगीने प्रवास करावा लागतो. जनरल बोगीतून प्रवासासाठी रेल्वे स्थानकात रांग लावावी लागते. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ही नोंदणीकृत संघटना गेली १६ वर्षे ठाणे स्थानकात प्रवाशांना रांगेत सोडण्याचे काम करते. परंतु यंदा रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांनी या संघटनेला प्रवाशांची यादी बनवण्यास तसेच फलाटावर रांग लावण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे कुटुंबासह जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. रांगेचा बेरंग होऊन फलाटावर चेंगराचेंगरी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना मात्र याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचा आरोप कोकणवासीय करीत आहेत.
...
महिला प्रवाशांची कुचंबणा
कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवासी आदल्या दिवसापासून फलाटावर येतात. पूर्वी कुटुंबातील एक जण रांगेत उभा राहत असे. नंतर गाडीच्या वेळेवर कुटुंब येत असे. पण आता संपूर्ण कुटुंबानेच २४ आधी रांगेत उभे राहण्याचा अघोषित फतवा रेल्वे सुरक्षा बलाच्या मुजोर अधिकाऱ्यांनी काढल्याने रांगेचे नियोजन कोलमडल्याचे दिसत आहे. कुटुंबे मुलाबाळांसह दिवस-रात्र उपाशी फलाटावरच बस्तान मांडून आहेत. या ठिकाणी साधी स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नसल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
...
कोकण प्रवासी संघटनेमार्फत यापूर्वी यादी तयार केली जात होती. चार वेळा हजेरी घेतली जात होती. मात्र आता जे गावी जाणार आहेत त्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा मनस्ताप होत आहे. पूर्वीसारखी यादी तयार करून चार वेळा हजेरी घ्यावी. त्याशिवाय कोकणात सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्या वेळेत सोडाव्या.
- लहू चव्हाण, प्रवासी
...
संघटनेमार्फत १६ ते १७ वर्षे गणेशोत्सवाबरोबर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना सुकर प्रवास करता यावा, यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. यंदा कोणीतरी तक्रार केल्याने आमच्यावर बंदी घातल्यामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल बघवत नाहीत. यातूनच दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठाणे आरपीएफ प्रशासनाची असेल.
- राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.