भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेम या दोन स्रोतांकडून विविध कारणांमुळे शहरातील वितरण वारंवार बंद होत आहे. परिणामी शहरांतर्गत पाणी वितरणाचे वेळापत्रक पार कोलमडून पडले आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल सहावेळा पाणीपुरवठा खंडित झाला, तर फेब्रुवारी ते सप्टेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत २९ वेळा वितरण रखडले होते. त्यामुळे नागरिकांना अनेकवेळा ६० ते ७० तासांनी पाणी मिळत आहे.
मिरा-भाईंदरला एमआयडीसीकडून दररोज १२५ दशलक्ष लिटर, तर स्टेमकडून ८५ दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर आहे, मात्र प्रत्यक्षात एमआयडीसीकडून ११७ दशलक्ष, तर स्टेमकडून ८५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. एमआयडीसीकडील उर्वरित आठ दशलक्ष लिटर पाणी मिळण्यासाठी महापालिका स्तरावरून, तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार पाठपुरवा केला जात आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनीही शहराला मंजूर कोट्यानुसार पाणी देण्याचे एमआयडीसीला आदेश दिले आहेत, मात्र त्याची अजूनही पूर्तता झालेली नाही. असे असताना एमआयडीसी व स्टेमकडून नियमितपणे होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही शटडाऊन, जलवाहिनीची गळती, वीजपुरवठी खंडित आदी विविध कारणाने व्यत्यय येत आहे. त्याचा परिणाम शहराच्या पाणीवितरणाच्या वेळापत्रकावर होत आहे.
सप्टेंबरमध्ये एमआयडीसीचा पाणीपुरवठा पाच, तर स्टेमचा एकदा खंडित झाला होता. त्यापैकी तीनवेळा वीजपुरवठा खंडित, दोनवेळा जलवाहिनीची गळती आणि एकदा देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आला. या सहापैकी दोनवेळा शहराचे पाणी तब्बल २६ व ३० तास बंद होते. एमआयडीसीचे पाणी जांभूळ येथील जलशुद्धीकरणातून दिले जाते. त्यासाठी तब्बल ८० किमीची जलवाहिनी टाकण्यात आली. स्टेमचे पाणीदेखील शहाड टेमघर येथील उदंचन केंद्रातून येते व त्यासाठीही ८० किमीची जलवाहिनी अंथरण्यात आली. कोणत्याही कारणाने पाणीपुरवठा खंडित झाला की ही जलवाहिनी पूर्णपणे रिकामी होते. पुरवठा सुरू झाल्यानंतर जलवाहिनी पूर्ण भरून योग्य दाब निर्माण होण्यासाठी काही तास जातात. परिणामी शहरातील वितरण नियमित होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. एकाच महिन्यात चार ते पाचवेळा पाणी बंद झाले तर पूर्ण महिन्याचे वेळापत्रक कोलमडून जाते. यावर्षी फेब्रुवारी ते सप्टेंबरमधील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर विविध कारणांमुळे तब्बल २९ वेळा पाणीपुरवठा बंद होता.
सुमारे ८० टक्केच वितरण
मिरा-भाईंदरच्या लोकसंख्येसाठी दररोज २५० दशलक्ष लिटर पाणी गरजेचे आहे, मात्र दोन्ही स्रोतांकडून केवळ २०२ दशलक्ष लिटर पाणीच शहराला मिळते. या तफावतीमुळे नागरिकांना पाणीपुरवठा नियमित असतानाही ३६ ते ४० तासांनी होतो. त्यातच पाणीपुरवठा खंडित झाला, तर हा पुरवठा ६० ते ७० तासांवर जाऊन पोहोचतो. अशातच आता दिवाळीही परिस्थिती कायम राहिली, तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणार आहे.
पाणीपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येवर एमआयडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात पाणीपुरवठा बंद करू नये, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत.
- नरेंद्र मेहता, आमदार, मिरा-भाईंदर
वर्षातील पाणी बंद
मे सात
जून सात
सप्टेंबर सहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.