स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा वेढा
पादचारी, प्रवासी आणि रिक्षाचालक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने अक्षरशः वेढला गेला आहे. पूर्व आणि पश्चिम दोन्ही प्रवेशद्वार बाहेर रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त आहेत. स्थानकाबाहेर येणाऱ्या प्रवाशांना रस्त्याने चालताही येत नाही, कारण भाजीपाला, कपडे, मोबाईल कव्हर्स, खाद्यपदार्थ आणि फळांचे फेरीवाले रस्ताच व्यापून बसले आहेत. नागरिकांना पदपथ वापरणे अशक्य झाले असून, ते थेट वाहनांच्या मधून चालण्याचा धोका पत्करत आहेत.
सकाळी आणि संध्याकाळी प्रवासी गर्दीच्या वेळी या भागात चालणे म्हणजे संकटाला आमंत्रण आहे. फेरीवाल्यांनी संपूर्ण रस्ता अडवला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. सणासुदीला होणारी कोंडी तर अगदी नकोशी होते. अनेकदा या फेरीवाल्यांचे आणि नागरिकांचे खटके उडतात. अगदी मारामारीपर्यंत आणि पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. दिवाळीच्या दिवसांत केवळ व्यवसाय करू पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना फेरीवाले जागा देत नाहीत. व्यवसाय करू देत नाहीत. डोंबिवली पश्चिमेला फेरीवाला आणि व्यावसायिक महिला यांचा झालेला वाद याचे उदाहरण आहे.
रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर अंतराच्या आत एकही फेरीवाला बसणार नाही, असा नियम आहे; मात्र या नियमाची पायमल्ली सर्रास कल्याण-डोंबिवली शहरात होत असल्याचे दिसून येते. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवाला नियंत्रण पथकाकडून अधूनमधून कारवाई केली जाते, मात्र ही कारवाई फक्त थातूरमातूर ठरते. काही तासांतच फेरीवाले पुन्हा जागेवर येतात. “पालिका प्रशासन आणि फेरीवाल्यांमध्ये मिलीभगत असल्याचा संशय येतो,” असा आरोप स्थानिक व्यापारी करत आहेत.
फेरीवाला धोरणाचा विसर
महापालिकेने काही वर्षांपूर्वी फेरीवाला धोरण जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभागात ‘फेरीवाला झोन’ निश्चित करून ओळखपत्र वाटप करायचे होते, परंतु प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, स्थानक परिसर आणि प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढतच चालला आहे.
रिक्षाचालकांची संतापजनक अवस्था
फेरीवाल्यांच्या या अतिक्रमणामुळे रिक्षा चालवणे कठीण झाले आहे. प्रवाशांना रिक्षा थांबवणे, वळवणे किंवा पुढे नेणे यासाठी जागाच शिल्लक नाही. “स्थानकाबाहेर रोजचा गोंधळ वाढत आहे. फेरीवाले हटवले नाहीत, तर आम्ही रिक्षा बंद आंदोलन करू,” असा इशारा डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.
नागरिकांचा सवाल
“पालिकेकडे नियंत्रण पथक आहे, पण ते फक्त नावापुरते. कारवाई केल्याशिवाय हा विळखा सुटणार नाही,” असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
१५० मीटर परिसर फेरीवाल्यांच्या ताब्यात
फेरीवाल्यांनी रस्ते आणि पदपथ पूर्णपणे व्यापले
प्रवाशांना चालणे कठीण; वाहन वाहतुकीला अडथळा
फेरीवाला पथकाची कारवाई निष्फळ
फेरीवाला धोरण अजूनही अमलात नाही
रिक्षाचालक संघटनेचा बंदचा इशारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.